महाराष्ट्रातील ६२ बेटांवर ध्वजारोहण ,रायगडातील खांदेरी, उंदेरी, जंजिरा बेटांचा समावेश

10 Jan 2025 17:02:22
 alibag
 
अलिबाग | देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील समुद्रकिनार्‍यांवरील ६२ बेटांवर ध्वजारोहण केले जाणार आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ५ बेटांचा समावेश आहे. हा ऐतिहासिक उपक्रम तटरक्षक दल, नौदल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सागरी महामंडळ स्थानिक प्रशासनाच्या मदतीने राबवला जाणार आहे.महाराष्ट्राच्या किनार्‍याची लांबी सुमारे ७५० किमी आहे.
 
हा किनारा भारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर स्थित आहे. सुंदर समुद्रकिनारे, लहान-मोठी बेटे आणि ऐतिहासिक किल्ले आहेत. महाराष्ट्राचा सागरी किनारा केवळ भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
 
एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देशभर पोहोचवण्यासाठी २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक महाराष्ट्राच्या किनार्‍यावरील ६२ बेटांवर ध्वजारोहण करण्यात येईल. रायगड जिल्ह्यातील उरण बेट, एलिफंटा बेट, अलिबाग येथील खांदेरी आणि उंदेरी बेट, तसेच मुरुड-जंजिरा बेटांचा समवेश आहे.
 
ध्वजारोहणाच्या तयारीच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांनी तयारी सुरू केली आहे. बेटांवर सफाई आणि सुरक्षा तपासणी करण्याच्या कामांना गती दिली आहे. यामध्ये सर्व बेटांवर ध्वजारोहणाची तयारी केली जात असल्याची माहिती सागरी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
 
अभिमान जागरुक हा उपक्रम महाराष्ट्राच्या समुद्रकिनार्‍यांवरील बेटांची महत्त्वाची जाणीव करण्यासाठी एक आदर्श ठरेल. त्याचबरोबर या उपक्रमामुळे लोकांमध्ये राष्ट्रीय एकतेचा, भारतीय संस्कृतीचा आणि भारताच्या महासागरी सीमांचा अभिमान जागरूक होणार आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ सागरी बेट, किल्ल्यांवर होणार ध्वजवंदन
एलिफंटा बेट उरण
सिंधुदुर्ग किल्ला (सिंधुदुर्ग बेट)
खांदेरी बेट (कांजा बेट) - रायगड,
उंदेरी बेट - रायगड,
मुरुड-जंजिरा बेट - रायगड,
निवती बेट - सिंधुदुर्ग,
तारकर्ली बेट - सिंधुदुर्ग,
सिंधुदुर्ग बेट - सिंधुदुर्ग,
द्वारका बेट -रत्नागिरी,
उरण बेट - रायगड,
मालवणी बेट, दाभोळ बेट
Powered By Sangraha 9.0