महाड शाळा नं.२ ची इमारत धोकादायक

By Raigad Times    01-Aug-2024
Total Views |
 mahad
 
वीद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र सध्या महाड शहरात पाहावयास मिळत आहे. शहरातील आझाद मैदानावरील नगरपरिषद शाळा क्रमांक २ या मुलींच्या शाळेची अत्यंत दयनीय व धोकादायक अवस्था झाली असून नगरपरिषद प्रशासन याकडे अक्षरशः दुर्लक्ष करीत आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का ? असा संतप्त सवाल आता नागरिक व पालकवर्गाकडून विचारण्यात येत आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट असताना इथे मात्र सर्व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची शिक्षा मिळत असल्याचे वास्तव समोर आले आहे. महाड नगर परिषदेच्या सर्वच शाळांची सध्या बिकट अवस्था असून त्यापैकी आझाद मैदानावरील ही दोन इमारतींची कौलारूवजा कन्या शाळा कित्येक वर्षापासून मुलींना शिक्षादानाचे पवित्रकार्य करीत आहे.
 
mahad
 
शाळा क्रमांक १ इमारतीची अवस्था देखील धोकादायक झाल्यामुळे ही शाळा देखील सध्या याच शाळेत भरविण्यात येत आहे. दोन्ही शाळेत मिळून आठ शिक्षक असून जवळपास शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु यापैकी शाळा क्रमांक २ ची इमारत मात्र अत्यंत धोकादायक झाली आहे. इमारतीच्या कौलारू छताचा आधारस्तंभ असलेल्या एकूण खांबांपैकी काही खांब हे कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. या खांबामधील गंजलेले स्टील देखील संपूर्णतः बाहेर पडले असून आजूबाजूचे सर्व सिमेंटचे आवरणही तुटून पडले आहे. काही खांब तर कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आहेत आणि सुरुवातीचा पहिला जीर्ण खांब तर चक्क लपाछपी करून लपवण्यात आल्याचे दिसून आले. जाण्यायेण्याच्या मार्गावर शेवाळ साचल्याने तो देखील निसरडा झाला आहे. कौलावर मोठमोठाल्या झाडाच्या फांद्या आल्यामुळे त्यादेखील तुटून कोसळण्याची शयता निर्माण झाली आहे. एकंदरीत अत्यंत धोकादायक परिस्थितीत येथील विद्यार्थिनी शिक्षण घेत असून प्रशासन मात्र त्यांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
याबाबत नगरपरिषद प्रशासनाला विचारणा केली असता शाळेतील या धोकादायक खांबांची व इतर परिस्थितीची नगरपरिषदेमार्फत पाहणी करण्यात आली असून त्याची डागडूजी लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर आणि बांधकाम विभागाचे प्रविण कदम यांनी सांगितले आहे. शाळेची नवीन इमारत मंजुरी, प्रस्ताव आणि निधी याच्या कचाट्यातून कधी पूर्णत्वाकडे जाईल आणि त्याला किती वर्ष लागतील याचा नेम नाही परंतु तोपर्यंत या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळणं नगरपरिषद प्रशासनाने बंद करून त्या ठिकाणी तातडीने इमारतीच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेऊन विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे. एखादी दुर्घटना घडल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा वेळीच उपाययोजना करून नगरपरिषदेने या चिमुकल्यांना निर्भयपणे शिक्षणाचा आनंद मिळू द्यावा अशी भावना आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत