“मुंबई टु गोवा महामार्गाचे काम” असा चित्रपट काढायला पाहिजे ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात मिश्कील टिपणी

By Raigad Times    06-Jul-2024
Total Views |
 MUMBAI
 
मुंबई । मुंबई-गोवा महामार्गाचे काम करुन दाखवतो असे सांगून कितीतरी आमदार झाले किंवा खासदार पण रस्ता काही पूरा होईना. “मुंबई टु गोवा महामार्गाचे काम” असा चित्रपट काढायला पाहिजे किंवा पुस्तक लिहायला पाहिजे, अशी मिश्कील टिपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल.
 
पण गडकरी या टर्ममध्ये रस्ता पूर्णच करुन दाखवतो,’ असे म्हणाल्याचे पवार यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पावर विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अजित पवार यांनी शुक्रवारी उत्तर दिले. यावेळी अजित पवार यांनी पायाभूत सुविधांबाबत बोलताना मुंबई-गोवा महामार्गाबाबतही वक्तव्य केले आहे.
 
अजित पवार म्हणाले की, नितीन गडकरींकडे तिसर्‍यांदा केंद्रीय मंत्र्यांची जबाबदारी मिळाली आहे. त्याचाही आपल्याला किती तरी फायदा होता, अशी माहिती अजित पवार सभागृहात देत असतानाच विरोधकांकडून मुंबई गोवा महामार्गाचा उल्लेख करण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाबाबत काही अडचणी वन विभागाच्या आल्या आहेत.
 
काही लोकांचा विरोध. ही खंत प्रत्येकालाच आहे. मनमोहन सिंगांचे सरकार असल्यापासून ते आता ही दहा वर्षे गेली. परंतु काय झाले? हे तपासलेच पाहिजे. जसा ‘बॉम्बे टु गोवा’ चित्रपट निघाला होता अमिताभ बच्चनचा तशा पद्धतीने मुंबई टु गोवा महामार्गाचे काम, असा चित्रपट काढायला पाहिजे किंवा पुस्तक पण लिहायला पाहिजे.
 
 
त्याला सगळेच जबाबदार आहे. काहींनी तिथे खड्डे बघितले, फोटो काढले, पाहणी केली. पण काही नाही. सगळ्यांनी त्याचा फायदा घेतला. कितीतरी आमदार झाले किंवा खासदार पण रस्ता काही पूरा होऊना. पण गडकरी म्हणाले आहेत या टर्ममध्ये रस्ता पूर्णच करुन दाखवतो,’ असं अजित पवार म्हणाले आहेत. ’शासनाने पायाभूत विकासांच्या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे.
 
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग, पुणे रिंग रोड, जालना-नांदेड महामार्ग, नागपूर-गोंदिया नागपूर-चंद्रपूर महामार्ग अशा पद्धतीने पायाभूत सुविधा मजबूत होण्याच्या दृष्टीने राज्य सरकार त्याकडे लक्ष देतंय. शिवडी न्हावा शेवा प्रकल्प पूर्ण झाला. शिवडी फ्लायओव्हरचे कामही गतीने सुरू आहे. कोस्टल रोडचे कामही अंतिम स्तरावर आहे,’ अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
 
’विरोधकांनी केलेल्या सूचनाची दखल अर्थविभागाने घेतली आहे. केंद्राने आपला अर्थसंकल्प मांडला की राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येतो, अशी परंपरा आहे. हा अर्थसंकल्प मांडताना राज्याने सर्वांगीण विकास व्हावा, महिला, शेतकरी सर्वांच्या अडचणी दूर व्हावा, याचा प्रयत्न या अर्थंसंकल्पातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वारकरी, महिला, शेतकरी या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे,’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.