मतदान वाढविण्याचे आव्हान;सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे.

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन

By Raigad Times    26-Apr-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग | लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
 
या बैठकीला जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, रेवती गायकर, जोस्ना पाडियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यासह विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
 
जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच आदिवासीक्षेत्रातील मतदारांचे मतदान महत्त्वाचे आहे याकडे लक्ष दिले जावे. मोठी गावे, शहरांमधील गर्दीची प्रभाग येथे मतदारांची संख्या मोठी आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मतदान व्हावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी दिव्यांग मतदार, ८५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक यांना आयोगाने घरून मतदान करण्याची (होम वोटिंग) सुविधा दिली आहे. याची अंमलबजावणी जिल्ह्यात व्हावी.
 
दिव्यांगांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी त्यांना द्यावयाच्या सुविधा सर्व मतदान केंद्रांपर्यंत उपलब्ध करण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.विभागीय आयुक्त पुढे म्हणाले, पोस्टल व होम वोटिंगद्वारे होणारे मतदान मतपत्रिकेवर होणार आहे. या दृष्टीने यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांचे आवश्यक प्रशिक्षण काळजीपूर्वक केले जावे. सी-व्हीजील, आचारसंहिता कक्ष, जिल्हा निवडणूक सन नियंत्रण कक्ष याकडे प्राप्त होणार्‍या तक्रारी सोडविण्यासाठी सतर्कता राखण्यात यावी, अशा सूचना डॉ. कल्याणकर यांनी दिल्या.
 
निवडणूक उन्हाळ्यात होत असल्याने मतदान दिवशी मतदान केंद्रांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, मतदारांच्या रांगांसाठी सावली असलेल्या जागा, वरंडा अथवा मंडप, शेड याद्वारे निर्माण करण्यात याव्यात, दिव्यांग मतदारांचे मतदान सहज होण्यासाठी समाजसेवी संस्थांची मदत घेतली जावी, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केल्या. मागच्या लोकसभा निवडणुकीत मतदार संघात ६२ टक्के मतदान झाले होते. यावर्षी त्यात वाढ अपेक्षित असून देण्यात आलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्राची पाहणी
रायगड लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यापूर्वी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूमची सुरक्षा, पायाभूत सुविधा, पॉवर बॅकअप आणि त्या ठिकाणी असलेल्या इतर सुविधांच्या आढावा श्री कल्याणकर यांनी यावेळी घेतला. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.