गाढवाची किंमत ६० हजार, माणसाची किती? अनंत गीतेंनी सांगितली गाढवाची ‘भन्नाट’ गोष्ट

By Raigad Times    24-Apr-2024
Total Views |
 pali
 
पाली /बेणसे | लोकशाहीत मतदान हा सर्वश्रेष्ठ आणि मौलिक अधिकार आहे. त्यामुळे मत विकू नका, आता काहीजण पैशांच्या जोरावर मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील, असे सांगत ‘गाढवाची किंमत ६० हजार, माणसाची किंमत किती, तर फक्त २००० रुपये का? असा सवाल उपस्थित करत, इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंनी गाढवाची भन्नाट गोष्ट सांगितली.
 
रायगड लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. त्यांच्या प्रचार सभांना जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. उल्का महाजन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मंगळवारी (२३ एप्रिल) सर्वहारा जनआंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगड मतदार जागृती मेळावा इंदापूर येथे घेण्यात आला.
 
या मेळाव्यात अनंत गीते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते बोलत होते. अनंत गीते पुढे म्हणाले की, भाजपकडून देशात विकासाचा केवळ भ्रम निर्माण केला जात आहे. वास्तव वेगळे आहे. जाहिरातबाजी करुन देशातील जनतेची फसवणूक केली जात आहे. जनतेला मोफत धान्य देण्याची घोषणा केली जात आहे. मोफत अन्नधान्य हा मोहजाळ आहे.
 
जसे उंदराला खाद्य दाखवून, लालूच दाखवून पिंजर्‍यात अडकवलं जातं, सापळा रचला जातो, तसाच हा सापळा रचला जात असल्याचेही ते म्हणाले. मासा जसा गळाला लावला जातो, तसे काम या देशात सुरु आहे. देशातील ८० कोटी जनता दारिद्य्र रेषेखाली आहे, अन्नासाठी मौताज आहे आणि म्हणे विेशगुरु, असा टोलाही अनंत गीतेंनी मोदींना लगावला.
 
यावेळी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई म्हणाले की, २०२४ ची लोकसभा निवडणूक भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा घोटाळ्याचा एक डागही ज्यांच्यावर नाही, असा स्वच्छ चरित्र्याचा लोकप्रतिनिधी संसदेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.
 
यावेळी देसाई यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. उल्का महाजन म्हणाल्या की, देश विघातक वळणावर पोहचला आहे. आदिवासी बांधवांच्या जमिनी, जंगले,जल या हक्क अधिकारावर भाजपने गदा आणली आहे.
पुढे आपल्याला जगणे मुश्कील होणार आहे.
 
महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते लोकशाहीच्या बाजूने निवडणूक रिंगणात आहेत. आपल्याला सन्मानाने जगायचे असेल तर इंडिया आघाडीची सत्ता आली पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. लोकशाही, संविधान आणि आपले हक्क अधिकार वाचवायचे असतील तर भाजप प्रणित कोणतेही उमेदवार असतील महायुतीच्या उमेदवाराला, पर्यायाने भाजपला तडीपार करा, असे आवाहनही उल्का महाजन यांनी या सभेत केले. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, मान्यवर,आदिवासीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.