सलमानच्या घराची रेकी करणार्‍या संशयितांना पोलीस कोठडी

By Raigad Times    17-Apr-2024
Total Views |
 MUMBAI
 
मुंबई | सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास
गोळीबार केला होता. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत संशयितांना गुजरातमधून अटक केली होती. ४८ तासांच्या आत पोलिसांनी त्यांची ओळख पटवून त्यांना भुज येथून ताब्यात घेतलं.
 
यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोन्ही संशयितांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी पत्रकार परिषदघेऊन यासंदर्भात माहिती दिली.
 
सलमानच्या घराबाहेर या दोघांनी पाच फायर राऊंड केल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही गुजरातमधील भुज जिल्ह्यातून विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन संशयितांना अटक केली आहे. या दोघांनी सलमानच्या घराची तीन वेळा रेकी केली. विकी गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) हे दोघे बिहारचे रहिवासी असून, रविवारी पहाटे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करून नंतर ते पसार झाले होते. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील ‘माता नो मध’ गावातून सोमवारी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली.पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल या अटकेतील दोघांना मंगळवारी मुंबईत आणून दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात केले होते.
 
गोळीबाराच्या घटनेमागील सूत्रधार ओळखण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेने या दोघांच्या कोठडीची मागणी केली. याप्रमाणे, न्यायालयाकडून दोघांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. याशिवाय या हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकीसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
 
दरम्यान, वांद्रेमधील गॅलसी अपार्टमेंटवर गोळीबाराची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरविणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय या सगळ्या प्रकरणावर आता खान कुटुंबीयांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे
 
. सलमानचा भाऊ अरबाजने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत
आहेत. आमच्या सुरक्षेची त्यांच्याकडून पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल खूप आभार असे त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.