खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा- माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर

By Raigad Times    13-Apr-2024
Total Views |
Panvel
 
पनवेल पिंपरी- चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे यांना एक लाख मतांची आघाडी देणार आहेत, त्या अनुषंगाने पनवेलमधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा असून पनवेलकरांची जबाबदारी वाढली आहे, असे सांगतानाच खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. १२) येथे केले.
 
३३ मावळ लोकसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुती पदाधिकारी मेळावा आकुर्ली येथील काकाजीनी वाडी येथे पार पडला. त्यावेळी मार्गर्दर्शन करताना ते बोलत होते.
 
Panvel
 
यावेळी व्यासपीठावर उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, आरपीआयचे नेते अमोल इंगोले, पीआरपीचे सीताराम कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड.प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख परेश पाटील, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शिवदास कांबळे, भीमसेन माळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा चव्हाण, भाजपचे कामोठे अध्यक्ष रवी जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, रमेश पाटील, प्रभाकर कांबळे, रुपेश ठोंबरे, सचिन तांबे, प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या राज्य सरकारने चांगले काम केले आहे, लोककल्याणकारी कार्य करत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून काम करता जनसंपर्क कायम ठेवला, तसेच लोकांना अपेक्षित विविध कामे केली आहेत.
 
पुन्हा एकदा त्यांना मतदार संसदेत पाठवणार आहे पण मतांची आघाडी जास्त झाली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघात घरोघरी धनुष्यबाण निशाणी पोहोचवा, असे सांगून श्रीरंग बारणे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
 
उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत माझ्यावर विश्वास टाकला आणि पुन्हा १८ लोकसभेसाठी महायुतीने मला संधी दिली आहे. पनवेल रायगडच्या जनतेने मला भरपूर प्रेम दिले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना नागरिरकांचे प्रश्न संसदेत मांडण्याचे आणि त्यांची सोडवणूक करण्याचे काम केले.
 
देश सुरक्षित हातात असले पाहिजे यासाठी पुन्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी हेच देशाला हवे आहेत. जगात आपल्या देशाची मान उंचावण्याचे काम त्यांनी केले आहे त्यामुळे मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. महायुती म्हणून पूर्वीपेक्षा ताकद वाढली आहे आणि हि एकसंघ ताकद मतांची मोठी आघाडी देणार आहे.
 
आणि त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि मित्रपक्षातील नेत्यांच्या ताकदीने पनवेलमधून सर्वाधिक मते मिळतील असा विश्वासही बारणे यांनी व्यक्त केला. दोन्ही निवडणुकीत त्यांनी प्रचंड काम केले आहे हे मी कधीही विसरू शकत नाही अशी स्पष्टोक्ती देतानाच मी केलेल्या कार्याचा विकासपर्व या जाहीरनाम्यात उल्लेख आहे, आणि यापुढेही जनतेचा विकासपर्व सुरूच ठेवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
 
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, देशामध्ये एनडीए सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना अनेक निर्णय आणि योजना लोककल्याणासाठी अंमलात आणल्या. त्यामुळे आज आपला भारत देश एक मोठी ताकद म्हणून जगात सक्षमपणे उभा राहू शकला आहे.
 
मोदीजींनी केलेली कामे आणि जगाचा त्यांनी जिकंलेला विश्वास हि आपल्या देशासाठी जमेची बाजू आहे. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार हा संपूर्ण जगाला विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक दिग्गज उद्योग भारतात येण्यासाठी आतुर आहेत. यामुळे आपल्या देशाची ख्याती जगात उंचाविण्याचे काम यापुढेही होणार असून अबकी बार चारसौ पार होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 
केंद्र सरकार राज्य सरकार जनतेच्या विकासासाठी काम करत आहेत. प्रत्येक गावात, प्रभागात विकासकामे अशीच सुरु राहण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे सरकार काळाची गरज आहे. खासदार श्रीरंग बारणे पुन्हा निवडून आल्यानंतर हा वेग वाढणार असून केंद्राच्या अखत्यारितील जनतेची कामे हक्कानी होणार आहेत, असेही त्यांनी म्हंटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा दिवसरात्र काम करतात तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त फेसबुकवर काम करत होते.
 
त्यामुळे त्यांचे सहकारी त्यांना सोडून गेले आणि त्यांच्या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापचे माजी आमदार बँक घोटाळ्यापोटी तळोजा जेलमध्ये आहेत. ठेवीदारांचे ५३० कोटी रुपये खाणारे कुठल्या तोंडाने मते मागणार आहेत असा सवाल उपस्थित करतानाच लोक त्यांना जाब विचारणारच असे सांगून मोदीजींच्या विमा निर्णयामुळे पाच लाख रुपये पर्यंतच्या ठेवी मिळाल्या आणि हे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे झाले.
 
लोकांचे पैसे बुडविणारे मते मागतात तर कामाचा जोरावर आप्पा बारणे हक्काने मत मागत आहेत. त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, अमोल इंगोले, पीआरपीचे सीताराम कांबळे, शिवदास कांबळे, शिवसेनेचे रामदास शेवाळे, परेश पाटील, प्रेरणा चव्हाण यांचीही भाषणे झाले.