कर्जत येथील शंभर वर्षांपासून भरतोय मिरची बाजार!

By Raigad Times    10-Apr-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत । कर्जत मिरची बाजारासाठीही प्रसिद्ध आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून सुद्धा या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची व खडे मसाले खरेदी करतात. या मिरची बाजाराला शंभर वर्षे होत आली आहेत. गेल्या वर्षी ग्राहकांना मिरचीचा जोरदार ठसका बसला होता.
 
मात्र यंदा मिरचीचे दर आवाक्यात असल्याने गृहिणींनी मिरची खरेदी करताना हात सैल सोडला आहे. महावीर पेठेत 10 - 12 दुकानांमध्ये मिरची व खडे मसाले विक्रीसाठी असतात. ही मिरची हैदराबाद-वारंगल, आंध्रप्रदेश - गंटूर, तेलंगणा आदी राज्यातून पुण्यात येते आणि तेथून ती कर्जतच्या बाजारात येेते.
 
हल्ली तयार मसाले मिळत असले तरी पहिल्यापासून ज्यांना कर्जतच्या मसाल्याची सवय आहे ते वर्षभरासाठी मसाला करण्यासाठी कर्जतची बाजारपेठ गाठतात. तसेच ग्रामीण भागात लग्न सोहळ्यासाठी भोजनाचा आस्वाद चांगला चाखायला मिळावा म्हणून वीस ते पंचवीस किलो मसाला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. खरा हा बाजार चार ते पाच महिनेच असतो आणि सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल होत असते.
 
जानेवारी ते मे या कालावधीत ही मिरची विकत घेण्यासाठी अगदी पेण, अलिबाग, पनवेल, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, लोणावळा, पुणे येथूनच नव्हे तर मुंबईतूनही ग्राहक येत असतात. परदेशातही आपल्या नातेवाईकांना कर्जत मधून मिरची घेऊन मसाला तयार करून पाठवण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.
 
यंदा किंमती बर्‍या पैकी असल्याने मिरची घेण्यासाठी मिरची व खडे मसाले घेण्यासाठी बहुतांश दुकानात ग्राहकांची गर्दी दिसते. मिरची सहा - सात प्रकारची असते.जयंतीलाल परमार, मदन परमार, शिवलाल गुप्ता हे तीन- चार पिढ्यांपासून हा मिरचीचा व्यापार करतात.
 
काही छोटे व्यावसायिक हातगाडीवरही हा व्यवसाय करतात. हा व्यवसाय हंगामात दोन कोटी रुपयांपर्यंत जातो कर्जतमध्ये मसाला दळण्याच्या मोजक्याच गिरण्या आहेत. तर तीन-चार ठिकाणी दणकी पद्धतीने मसाला कुटून दिला जातो. या पद्धतीच्या मसाल्याला चांगली चव असते.
 
दहिवली, आमराई आणि दाहिवली मध्ये या प्रकारच्या दणक्या आहेत. कर्जत व भिसेगाव येथे दगडेंची मसाला गिरणी प्रसिद्ध आहे. तर गुप्ता बंधूंची गिरणी सुद्धा बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे. वांजळे व सावरगाव याच्या मधोमध ठाकरे यांची मसाला गिरणी आहे. कडावमध्ये चांगल्या प्रकारे मिरची दळून दिली जाते.
 
त्या भागातील ग्रामस्थ तेथे मिरची, धणे, हळद करुन घेतात. काही मोक्याच्या गावात उदारणार्थ नेरळ, कशेळे, कळंब आदी ठिकाणी सुद्धा मसाला गिरणी आहेत तर छोट्या गावांमध्ये सुद्धा मिरची दळून दिली जाते. यंदा मिरचीचे दर आवाक्यात असल्याने अनेक गृहिणींनी मिरची विकत घेताना काटकसर केली आहे.
 
खड्या मसाल्याचे दर स्थिर असल्याने गृहिणींनी हात सैल सोडला आहे. दररोज जेवणात मसाला वापरावा लागत असल्याने गेल्या वर्षी नाईलाजाने मिरची खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. गेल्या वर्षी मिरचीच्या दरामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले होते.
 
यंदा मिरचीचे दर कमी झाल्याने व्यवसाय चांगला होत आहे, असे व्यापारीवर्गाचे म्हणणे आहे.मिरची प्रति किलो दर  गंटूर मिरची 240 रुपये,लवंगी मिरची 220 ते 250 रुपये, बेडगी मिरची 350 ते 450 रुपये, काश्मिरी मिरची 350 ते 550 रुपये,संकेश्वरी मिरची 250 ते 440 रुपये, पट्टी मिरची 320 रुपये तर खडे मसाले प्रति किलो धणे 180 ते 200 रुपये, हळद 120 ते 180 रुपये, बडीशेप 280 रुपये,दालचिनी 400 रुपये, लवंग 800 रुपये, काळीमिरी 800 रुपये, जावंत्री 2800 रुपये तर नाकेश्वर 2400 रुपये किलो आहे.