तटकरे पराभव असा करणार की, निवडणुकीला पुन्हा उभे राहणार नाही ; शेकाप आ.जयंत पाटील यांची जोरदार टिका

By Raigad Times    29-Mar-2024
Total Views |
 Murud
 
मुरुड । सुनील तटकरे यांना त्यांचे बंधू अनिल तटकरे यांनी मोठे केलं. पण सुनील तटकरे यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे, की सुनील तटकरे पुन्हा निवडणुकीला उभे राहणार नाहीत अशी स्थिती करायची आहे. असा निर्धार शेकापनेत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
 
बुधवारी ( 27 मार्च) मुरुडमध्ये शेकापचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात जयंत पाटील यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको असल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केले. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी रायगडमधून सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे रायगडमधून शिवसेनेचे (ठाकरे गट ) अनंत गीते आणि तटकरे यांच्यात लढत होणार आहे. शेकापने यावेळी शिवसेनेला साथ दिली आहे. तटकरे यांनी नुकतेच मुरुडमधील शेकापचे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीत घेतले होते. या पार्श्वभुमीवर झालेल्या सभेत आ. पाटील यांनी तटकरेंवर जोरदार टिका केली.
 
जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांची पर्वा न करता शेकापचा लाल बावटा घेऊन सर्वांनी वेगळ्या उमेदीने कामाला लागा असं आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच शेकाप कधीही संपणार नाही असा इशाराही दिला. यावेळी बोलताना, आ. जयंत पाटील यांची जिभ घसरली. त्यांनी सुनील तटकरेंचा उल्लेख अजित पवारांची दुसरी पत्नी असा केला.
 
शेतकरी कामगार पक्ष दिलेला शब्द पाळतो. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये अनेकांवर विश्वास ठेवून त्यांना शेतकरी कामगार पक्षाने जिंकून आणले आहे. त्याच पक्षाला संपविण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने केला जात आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.
शेतकरी कामगार पक्ष संघर्षातून निर्माण झाला असून एकनिष्ठ व स्वाभीमानी आहे. ही पक्ष गरीबांची बांधिलकी असणारा आहे याची जाणीव विरोधकांनी ठेवली पाहिजे. शेतकरी कामगार पक्ष कधीही न संपणारा पक्ष आहे असं जयंत पाटील म्हणाले आहेत.