रोहा | लोकसभा निवडणुकेची आचारसंहिता कधीही लागु शकते. मात्र रायगड लोकसभेच्या उमदेवारीवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमधील तिडा अजूनही सुटलेला नाही. त्यातच रोह्याच्या प्रवेशद्घारावरापासून जागोजागी भिंतींवर अब की फार फिर मोदी सरकार’ अश्या घोषवाक्यासह भाजपच्या कमळ ही निशाणी रेखाटण्यात आल्याचे दिसत आहे.
त्यामुळे महायुतीचा उमेदवार बदलणार आहे की, निशाणी? अशी चर्चा सुरु आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातही राजकीय वारे जोराने वाहत असून मवीआने अनंत गिते यांची उमेदवारी घोषित करत प्राथमिक आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महायुती मधून विद्यमान खासदार सुनिल तटकरे की माजी आमदार धैर्यशील पाटील यापैकी कोण यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. दोन्ही बाजूने परस्पर दावे प्रतिदावे होत असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
मध्यंतरी सुनिल तटकरे यांच्यासह १२ नेतेच भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या. कॉगेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तसा दावा केला होता. त्यामुळे तटकरे खरोखर अजित पवार यांची साथ सोडणार का? यावर चर्चा रंगली होती. याच पार्श्वभुमिवर रोह्यामध्ये ठिकठिकाणी रेखाटलेली भाजपची निशाणी पाहूण नवीनच चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, रोहात महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांच्या फलकांनी शहरातील प्रत्येक कोपरा व्यापले आहे. अगदी कुंडलिका नदी पात्रातही पाट्या लावल्या गेल्या आहेत. आता दिवसेंदिवस वाढत असणार्या या कमळाच्या फुलांची संख्या थांबते की वाढते हे लवकरच समोर येणार आहे.