पाली /बेणसे । रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी खालापूर येथील एका निराधार महिलेला गावठाण मध्ये जागा मिळावी यासाठी खालापूर मुख्याधिकारी यांना बुधवारी (ता.14) निवेदन दिले. मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.
खालापूर नगरपंचायत हद्दीत राहणार्या जयश्री विजय लोंढे निराधार असून बेघर आहेत. सदर महिलेच्या पतीचे 2021 मध्ये कोरोना काळात निधन झाले आहे. या महिला येथील कायमस्वरूपी रहिवासी आहेत. मात्र त्यांना राहण्याकरिता कुठलीही व्यवस्था नाही त्या मिळेल त्या ठिकाणी आसरा शोधत असतात. त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे.
याआधी वारंवार या महिलेने नगरपंचायत कार्यालयाकडे राहण्यासाठी जागा मिळावी अशी मागणी केली आहे. मात्र या महिलेला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नगरपंचायतने या महिलेस राहण्यासाठी गावठाण हद्दीत कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा महिलेस वंचीत बहुजन आघाडी आमरण उपोषण करतील असा इशारा निवेदनात दिला आहे.