मुरुड तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग , रब्बी वाणांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता

By Raigad Times    12-Dec-2024
Total Views |
 Murud
 
मुरुड जंजिरा । यंदा मुरुड तालुक्यात सरासरीपेक्षा दमदार पाऊस झाला असून नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच शेतकरी रब्बी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागले आहेत. यावर्षी समाधानकारक पावसामुळे तालुक्यात सरासरी 370 हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
गेल्या आठवड्याभरापासून आता पहाटेच्या वेळी मात्र, धुक्याची चादर व दव पडत असल्याने वातावरणात गारठा जाणवत आहे. भातकापणीचा हंगाम पूर्ण झाला असून शेतातच उंडे रचल्याचे तर काही ठिकाणी भाताची मळणी सुरु असल्याचे चित्र आहे. तर काही शेतकर्‍यांनी भाताची कापणी केल्या नंतर ट्रॅक्टरने तर बैलांच्या सहाय्याने नांगरणी सुरु केली आहे.
 
कोकणात मूग, चवळी, हरबरा , मटकी ही कडधान्ये येऊ शकतात मात्र कडवे वाल व्यतिरिक्त इतर दुबार पिके शेतकरी घ्यायला धजत नसल्याची स्थिती आहे. तालुक्यात 3 हजार 200 हेक्टर भात लागवडयोग्य जमीन असली तरी रब्बी पीकांसाठी लागणार्‍या कालव्याची वा विहीरींची सोय नसल्यामुळे शेतकरी वर्ग सर्वच क्षेत्रावर कडधान्य घेऊ शकत नाहीत. गतवर्षी कडधान्यांपैकी कडवे वाल, हरबरा, मूग व चवळी मिळून एकूण 358 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पीक पेरणी केली गेली होती.
 
वालाची मागणी मोठया प्रमाणात असल्याने शिवाय आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर होत असल्याने शेतकर्‍यांकडुन जोडधंदा म्हणून शेतात पीक घेतले जाते. थंडीच्या दवामुळे जमीन ओलसर होते. त्या दवामुळे वाल, कलिंगड या पिकांना मोठया प्रमाणात पोषक द्रव्य जमिनीतून मिळते. त्यामुळे शेतकर्‍यांना ही पिके मोठे उत्पन्न देणारी असून काही लोकांना रोजगार मिळतो.
 
कडधान्य तसेच कलिंगडीचे पिक मुरुड तालुक्यातील तेलवडे, शिघ्रे, आदाड, खारअंबोली, काकळघर, बोर्ली, मांडला, वाणदे, जोसराजण, वावडुंगी व आदिंसह गावातून मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वालाचे लागवड क्षेत्र का वाढत नाही? याबाबत विचारले असता दिनेश मिणमिने या शेतकर्‍याने सांगितले की, बियाणे, नांगरणी या खर्चापेक्षा ही शेताला काटी कुंपण करताना खर्च मोठा असतो. भात शेती उलगल्यानंतर उनाड गुरांचा खूप त्रास होतो. त्यामुळे ज्यांच्या घरात शेती करणारी माणसे आहेत त्यांना परवडते.
भात पड क्षेत्रामध्ये कडधानांचे उत्पन्न वाढविणे या योजनेंतर्गत मूग व हरभरा प्रात्यक्षिके साठी हेक्टरी 7 हजार 500 अनुदान असून निविष्ठा स्वरूपात देण्यात येते. तसेच मसूर कडधान्याचे क्षेत्र वाढ करणेसाठी मसूर बियाणे मिनीकिट देणार आहेत. - मनिषा भुजबळ, मुरुड तालुका कृषी अधिकारी