महाड | यावेळची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक असून ज्या ‘मिंधे सरकार’ने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले, ते उद्योग पुन्हा आणून रोजगारनिर्मिती करण्यासाठी परिवर्तन करा, असे आवाहन शिवसेनेचे युवानेते युवा सेनेचे प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांनी महाडच्या सभेतून केले.
महाड मतदार संघातील महाविकास आघाडी तर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या जाहीरसभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे माजी मंत्री सुभाष देसाई, संजय कदम, नागेश राठोड आदी मान्यवर उपस्थितहोते.
यावेळी बोलताना सुभाष देसाई यांनी राष्ट्रवादीचे बाबुशेठ खानविलकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश करीत स्नेहल जगताप यांनाभाऊबीजेची ओवाळणी दिली असून महाडच्या गद्दाराला पाडण्यासाठी स्नेहलरुपी वाघिण पुरेशी आहे, असे सांगितले. महाराष्ट्रातील रोजगार टिकवणे हे आमचे स्वप्न असल्याचे देसाई यांनी सांगितले.
स्नेहल जगताप यांनी आबांचे स्वप्न आपण शंभर टक्के विजयी होऊन पूर्ण करू असा विश्वास व्यक्त करीत महाडच्या विद्यमान आमदारांनी १५ वर्षात खंडणीखोरीशिवाय काही केले नाही, असा आरोप केला. ही निवडणूक ‘निष्ठावंत विरुद्ध गद्दार’ अशी असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेसाठी १० वाजल्यापासून जनता आली होती. आदित्य ठाकरे यांचे दुपारी २ वाजता आगमन झाले. साळीवाडा नाका येथून स्नेहल जगताप यांची भव्य रॅली काढण्यात आली.