पेणमध्ये दोन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन

वाशीवली, जावळी ग्रामपंचायतींना आयएसओ प्रमाणपत्र प्रदान

By Raigad Times    30-Jan-2024
Total Views |
pen
 
पेण । पेण तालुक्यातील वाशीवली, जावळी या दोन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
 
शासन व्यवहारात पारदर्शकता तसेच गतिमानता यावी यासाठी ई गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीमधील विविध रजिस्टर्स, फॉर्मस, दस्ताऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींची कार्यपद्धतीचे पुर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मिती करण्याची गरज आहे.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2019 मध्ये घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
 
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, स्वच्छतागृहे बांधणे, गावात साफसफाई असणे, गावात व्यायमशाळा, स्वच्छ पाणीपुरवठा करणे, घरपट्टी पाणीपट्टी वसुली, ग्रामसभांत नियमित विषयांवर चर्चा, गावात वृक्षारोपण करणे यासह इतर शासकीय योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे.
 
जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्‍या आयएसओ करण्यासाठी व्हि.एन.टेक्नो. रिसर्च प्रा.लि. कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील वाशीवली, जावळी या दोन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.