दिघी (गणेश प्रभाळे) : कोकणातील रत्नागिरी-रायगड जिल्हे जोडणारा म्हाप्रळ आंबेत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, गुरुवारी सायंकाळी पूल कोसळल्याची माहिती सोशल मीडियावर वार्यासारखी पसरताच, एकच खळबळ उडाली.
आंबेत पूल कोसळला म्हणून सोशल मीडियावर दोन दिवसांपासून अफवा पसरत आहे. जुन्या पिलरचा काही भाग कोसळण्याच्या आवाजामुळे परिसरातदेखील घबराट उडाली होती. याविषयी समाजमाध्यमांत उलटसुलट चर्चा सुरू असल्याने वास्तवात या घटनेची माहिती घेण्यात आली.
दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग माणगाव यांच्या माध्यमातून सुरु आहे. या दुरुस्तीच्या कामात तयार करण्यात आलेली इन्स्पेक्शन गॅलरी गुरुवारी रात्री अचानक कोसळली. मात्र, या गॅलरीचा कोणताच धोका नवीन कामाला झाला नसल्याची माहिती समोर आली.
या कामामध्ये वापरण्यात येणार्या बेअरिंग लावण्यात आल्यानंतर या बेअरिंगची पाहणी करण्यासाठी ही गॅलरी तयार करण्यात आली होती. पुलाच्या सुरु असलेल्या स्लॅबचा कामात या कोसळलेल्या भागामुळे कोणतीच बाधा अथवा अडचण निर्माण झाली नसल्याचे बांधकाम विभागाकडून माहिती देण्यात आली.
------------------------------------
जुन्या पी-5 पिअर्सच्या स्लॅब व आटीकुलेशनचा भाग पूर्वी आवश्यकतेएवढा तोडण्यात आलेला होता. नवीन गर्डर्सचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु असताना जुन्या तोडलेल्या पिअर पी-5 चे म्हाप्रळ बाजूकडील आटीकुलेशन तुटून पडले. सदर तुटून पडलेल्या भागामुळे नवीन बांधकामास कोणतीच हानी पोहचली नाही.
- श्रीकांत गणगणे,
सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी