रायगड जिल्ह्यतील दुर्गम गावाना तिन महिन्याचे एकत्र मिळणार रेशन!

By Raigad Times    14-Jul-2023
Total Views |
raigad reshan 1
 
अलिबाग | अतिवृष्टी दुर्गम गावातील नागरीकांचा संपर्क तुटतो. अशावेळी त्यांची अन्नधान्याअभावी आबाळ होवू नये यासाठी
जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. गावातील कुटुंबांना सप्टेंबर महिन्यापर्यत पुरेल इतके धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हयात २ हजार क्विंटल गहू आणि ५ हजार क्विंटल तांदळाचा पुरवठा करण्यात आला आहे. राज्यातील अनेक गावे, वाडया वस्त्या दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या आहेत. अशा गावात पावसाळयाच्या दिवसात वाहतूक व्यवस्था बंद असते. कधी-कधी अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना पूर येवून अशा गावांचा बाजारपेठांशी संपर्क तुटतो.
 
अशावेळी, त्यांना पुरेसे अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी पावसाळयापूर्वीच त्या गावात धान्याचा पुरेसा साठा करून ठेवण्यात येतो. पावसाळा संपेपर्यत पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध करून दिला जातो. रायगड जिल्हयाचा विचार केला तर जिल्हयातील दुर्गम डोंगराळ भागात आदिवासी समाजाची वस्ती आहे. पावसाळयाच्या सुरूवातीला भात लागवडीची कामे संपल्यानंतर त्यांना साधारण दसर्यापर्यत रोजगार उपलब्ध नसतो. अशावेळी या कुटुंबांची अन्न्धान्या अभावी कुपोषण होवू नये, यासाठी राज्य सरकारने नवसंजीवनी योजना सुरू केली आहे.
 
raigad reshan 1
 
त्यानुसार, पावसाळा सुरू होण्यापूर्वी या कुटुंबांना धान्याचा पुरवठा केला जातो. यावर्षी रायगड जिल्हयात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत अशाप्रकारे धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये महाड तालुक्यातील सर्वाधिक १६ गावांचा समावेश आहे. त्याखालोखाल पेण तालुक्यातील १४ गावांमध्ये धान्यपुरवठा करण्यात आला आहे. उरण तालुक्यातील घारापुरी बेटावरील नागरीकांना देखील ऑगस्ट अखेर पुरेल इतके धान्य वितरीत करण्यात आले आहे. कर्जतमधील माथेरान, सुधागडमधील सिदधेश्वर खुर्द, उसर तर रोहयातील पांगळोली, कालकाई ही गावे या योजनेत समाविष्ट असून त्यांनादेखील ३ महिन्यांच्या धान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली.