रोहा । रोहा तालुक्यातील निडी गावात पाहूणे आलेल्या दोन सहा वर्षांच्या मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काळीज पिळवटून टाकणार्या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. यातील एक मुलगा पेण येथून मामाच्या गावाला आला होता तर दुसरा मुंबईतून पालखीसाठी गावाला आला होता.
पेण तालुक्यातील झोतिरपाडा येथे राहणारा आरुष हितेश भोय हा सहा वर्षांचा मुलगा आपल्या मामाच्या गावी पालखी सोहळ्याकरिता आला होता. तर दुसरा मुलगा निरव रोहण वाघमारे (वय वर्ष 6) हा घाटकोपर मुंबई येथून आपल्या मुळ गावी निडी येथे आला होता.
रविवारी 23 एप्रिल रोजी ही दोन्ही मुलं गावाच्या बाजूला असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. दोन्ही मुलं पोहण्यासाठी पाण्यात उतरली. पाण्याचा त्यांना अंदाज आला नाही आणि दोघेही बुडू लागले. दुपारची वेळ होती त्यावेळी तलावाजवळ गावातील अन्य कोणीही न्हवते. त्यामुळे या दोघांना वाचवण्याची संधीदेखील कोणाला मिळाली नाही.
शाळेच्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे ही दोन लहान मुलं पालखी सोहळ्याच्यानिमित्ताने निडी येथे आले होते. त्यांचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून जाणारा आहे. या घटनेनंतर निडी गाव शोकसागरात बुडाला आहे. तर त्यांच्या आई वडीलांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
शाळांना सुटट्या पडल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांवर सर्वांनी लक्ष ठेवा. असे प्रकार भविष्यात घडू नयेत म्हणून आपल्या लेकरांचा सांभाळ करा अशी प्रतिक्रीया तंटामुक्त अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यानी दिली.