कोर्लई । पर्यटनाच्या ऐन हंगामात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशीद- बीच वर पर्यटकांची वर्दळ नसल्याने शुक्रवार पासून शुकशुकाट पहायला मिळत आहे. किमान काशीद बीच वर शनिवार रविवार सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांची मोठी वर्दळ असते.
मुरूड बीचवर देखील जंजिरा पाहणारे पर्यटक येत असतात.
परंतु गेल्या काही दिवसांपासून फारसे पर्यटक आलेले दिसून येत नाहीत. याचा येथील पर्यटनावर परिणाम दिसून येतो आहे.यामुळे पर्यटन व्यवसायिकांना नुकसानीचा फटका बसला आहे. पर्यटक येतील असा कयास गेल्या आठवड्यात पर्यटन क्षेत्रातील काही मंडळींनी व्यक्त केला होता; मात्र तो फोल ठरल्याचे दिसत आहे.
मागील आठवड्यात काशीद बिचवर जेमतेमच पर्यटक आले होते. साळाव ते मुरूड या 32 किमी मार्गावर खड्डे पडल्याने मुंबई कडील पर्यटक काशीद किंवा मुरूड कडे येण्यास सहजासहजी तयार होत नाहीत. रस्ते खड्डेमय असल्याने सर्वच जणांनी वारंवार नापसंती व्यक्त केली आहे. गणेशोत्वात देखील खड्डेमय परिस्थिती राहिली होती.
आता दिवाळी ऐन तोंडावर आली तरी देखील अशीच परिस्थिती राहिली तर उरले सुरल्या पर्यटनाचे बारा वाजणार की काय?अशी चिंता अनेकांकडुन व्यक्त होत आहे.
साळाव ते मुरूड रस्त्यावर खड्डे पडले असल्याने सध्या मुरूड कडे येणारे बहुतांश पर्यटक पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रातुन येत असल्याचे दिसून येत आहे.रस्त्यावर पडलेले खड्डे असेच राहिल्यास पर्यटन उद्योगावर मोठा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असे स्पष्ट दिसत आहे.