जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत १ लाख ७४ हजार शेतकर्‍यांचा लॅन्ड डेटा अपडेट

By Raigad Times    11-Sep-2022
Total Views |
Raigad3
 
 
अलिबाग  | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात १ लाख ७४ हजार २१६ शेतकर्‍यांचा समावेश झाला असून, यासंदर्भातील लॅन्ड डेटा ऑनलाईन अपलोड करण्याचे तसेच ई-केवायसी कार्यवाही पूर्ण करण्याचे काम पुर्ण झाले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळातही कोणतीही सुट्टी न घेता जिल्हा प्रशासनातील या अधिकारी-कर्मचार्‍यांनी हे काम अल्पावधीतच पूर्ण केले.
 
 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दि.९ सप्टेंबर २०२२ रोजी पर्यंत रायगड जिल्ह्यात लॅन्ड डेटा अपलोड झालेल्या नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या: १ लाख ७४ हजार २१६, एकूण आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या:- १ लाख ३६ हजार १५५, प्रमाणीकरणानंतर स्वीकृत झालेल्या एकूण अभिलेख्यांची संख्या: १ लाख ४९ हजार ४७६, प्रमाणीकरण झाल्यानंतर स्वीकृत झालेल्या शेतकर्‍यांची संख्या:- १ लाख ५ हजार ३७३ अशी आहे.
 
 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ९ सप्टेंबर २०२२ रोजी पर्यंत रायगड जिल्ह्यात ई-केवायसी कार्यवाहीत आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकर्‍यांची संख्या- १ लाख ३६ हजार १५५, ई-केवायसी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या: १ लाख १२ हजार ९७६ (८२.९८%) यापैकी कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत ७५ हजार ९५७ (५५.७९%) लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यात आले आहे. अद्याप २३ हजार १७९ (१७.०२%) लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणे बाकी आहे. तर ३१ हजार ७११ (२३.२९%) लाभार्थी अपात्र ठरले आहे.
 
 
केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत लाभार्थी शेतकर्‍यांना प्रत्येकी चार महिन्यांच्या कालावधीत २ हजार रुपये दिले जातात. त्यानुसार वर्षाला एकूण ६ हजार रुपये अनुदान स्वरूपात बँक खात्यावर जमा करण्यात येतात. या योजनेतील लाभार्थ्यांची निवड करताना शासनाने काही नियम-अटी ठरवून दिल्या आहेत. त्यानुषंगाने प्रत्येक लाभार्थी शेतकर्‍याची माहिती अपडेट करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले व यासाठी दि.७ सप्टेंबर २०२२ ही अंतिम तारीख घोषित करण्यात आली होती.
 
 
या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रायगड जिल्हा प्रशासनाकडे सोपविण्यात आल्यानंतर त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, ग्रामविकास व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी रात्रंदिवस काम करून लाभार्थी शेतकर्‍यांचा डेटा एकत्रित करून तो ऑनलाईन अपलोड करण्याची कार्यवाही काही दिवसांतच यशस्वीरित्या पार पाडली.
 
 
ही माहिती केली संकलित:- जमिनीचे क्षेत्र, बँक खाते क्रमांक, डाटा क्रमांक, खात्याचा प्रकार, फेरफारचा प्रकार अशा प्रकारची माहिती जमा करून ती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम करण्यात आले.