कर्जत | कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील आषणे गावातील रस्त्याची पावसाच्या पाण्याने दुरावस्था झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती न केल्यास संपूर्ण रस्ता वाहून जाण्याची भीती असून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी निवेदन देवून केली आहे.
आषाने गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेकडून गावाच्या नाल्याच्या बाजूने असणारा सिमेंट काँक्रिटचा असलेल्या या रस्त्यावरून डोंगरातून येणारे पावसाचे पाणी वाहत जात असते. त्यात यावर्षी सलग पंधरा दिवस पावसाचे पाणी त्या रस्त्यावरून वाहत होते आणि त्यामुळे गावातील रस्त्याच्या खाली असलेला भराव वाहून जात आहे. वाहून गेलेला भराव यामुळे सिमेंट रस्ता खचत गेला आहे.
परिणामी संपूर्ण रस्ता खचून वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्या स्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्षासहल प्रेमी येत असतात आणि त्यामुळे रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी मनसेच्या वतीने उमरोली ग्रामपंचायत आणि कर्जत पंचायत समिती यांच्याकडे केली आहे.