पालीकरांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा कधी संपणार?

पाली शहराचे सांडपाणी अंबा नदीत, नागरिकांच्या जीवाशी खेळ

By Raigad Times    13-Aug-2022
Total Views |
PALI
पाली/बेणसे | महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक आणि भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
 
 
नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ कधी थांबणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. पावसाळ्यात तर पाण्याची परिस्थिती अधिक भयानक होतेय, सरकार बदलत राहिली की योजनांच्या अंमलबजावणी वर देखील त्याचा परिणाम होतोय, हे सातत्याने दिसून आलेय, पालीकरांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा कधी संपणार, हाच सवाल सातत्याने समोर येतोय.
 
 
येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प पालीत उपलब्ध नाही. तसेच तब्बल 27 कोटींची शुद्धपाणी योजना देखील लालफितीत अडकलेली आहे. परिणामी भाविक आणि नागरिकांना नाईलाजाने हे प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे.
आतापर्यंत नळाच्या पाण्यातून साप, बेडूक, शंखशिंपले आणि मासे आदी प्राणी आले आहेत. याबरोबरच शेवाळ, चिखल हे नेहमीच येत असते.
 
 
आजूबाजूच्या कारखान्यांतून प्रदूषित पाणी देखील अंबा नदीमध्ये सोडले जाते. असे प्रदूषित पाणी नाईलाजाने लोकांना वापरावे लागते आहे. अनेक नागरिक प्रदूषित पाणी पिण्यापेक्षा कूपनलिका आणि विहीरीचे पाणी पिण्यावर भर देत आहेत. बहुतांश जण विकतचे बाटलीबंद पाणी पितात. नियमित पाणीपट्टी भरून देखील लोकांना असे प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने प्रदूषित पाण्यापासून आमची सुटका करावी असा सुर नागरिकांमधून उमटत आहे. या दूषित पाण्याचा परिणाम येथील मासे आणि जलचर प्राण्यांवर देखील होत आहे.
 
 
नुकतेच पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले आहे. शिवाय नगरपंचायत निवडणूक प्रचारात सर्वच पक्षाचे नेते तसेच स्थानिक मंत्री, आमदार आणि खासदारांनी देखील पाली शुद्धपाणी योजना कार्यान्वित करू, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे ही आश्वासने नक्की प्रत्यक्षात केव्हा उतरणार या आशेवर पालीकर आहेत.
 
 
कोटींची मंजूर शुद्धपाणी योजना कार्यान्वित करण्यात कोणत्याच अडचणी नसतांना यासाठी थांबून काय फायदा आहे. याबाबत विनाकारण कोणीही राजकारण न करता पालीकरांचा विचार करून शुद्धपाणी योजना लागलीच कार्यान्वित करावी.
शुद्ध नळपाणी योजना लालफितीत
शासनाने केलेल्या 2008-09 च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या आणि पालीत दररोज येणार्‍या भाविक आणि पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79 लाखाचा निधी आणि 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतू राजकीय श्रेयवादामध्ये ही योजना रखडली गेली. त्याबरोबर 10 टक्के लोकवर्गणीचा प्रश्न देखील होता. मात्र पालीला ‘’ब’’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे. सध्यस्थितीत ही योजना 27 कोटींवर गेली आहे.