कमकुवत दरडींमुळे ताम्हिणी घाटातील प्रवास असुरक्षित!

पावसाळ्यात पुणे-माणगाव रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांचा जीव टांगणीला

By Raigad Times    02-Jul-2022
Total Views |
mangaon
 
 
माणगाव । आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणाऱ्या माणगाव-ताम्हिणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाची संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. तसेच या मार्गालगत उंच डोंगर असल्याने दरडी कोसळण्याची भीती प्रवासी वर्गातून होत असून प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दुर्लक्ष केले आहे. १९९८-९९ मध्ये या रस्त्याचे काम करण्यात आले. त्यावेळेस पुणे दिघी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात आला त्यावेळेस काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम डबर आणि सिमेंटमध्ये करण्यात आले होते. परंतु ते काम मजबूत झाले नसल्यामुळे या संरक्षक भिंती आता कमकुवत झाल्या आहेत. या रस्त्याच्या साईडला खोल दऱ्या आहेत. त्यातच हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना धोका जाणवत आहे. काही ठिकाणी अवघड वळणांवर संरक्षणासाठी पत्र्याचे कवच उभारले आहे. तर काही ठिकाणी अवघड वळणांवर कोणत्याही प्रकारचे संरक्षणासाठी बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. कोणतीही दुर्घटना या मार्गावर घडू नये म्हणून शासनाच्या संबंधित खात्याने कमकुवत कठडे व धोकादायक वळणे यांना संरक्षण भिंत उभारणे गरजेचे आहे अशी मागणी प्रवाशी आणि पर्यटकांकडून होत आहे.
 
 
ताम्हिणी घाटाच्या पायथ्याशी सणसवाडी गावाच्या हद्दीपासून १० ते १२ किलोमीटरचा रस्ता असल्यामुळे ज्या ठिकाणी अवघड वळणे आहेत त्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधणे आवश्यक आहे. परंतु येथे काही ठिकाणी संरक्षक भिंतीचा अभाव असून वाहने चालवताना तेथील खोल दऱ्यांच्या वाहन चालकांना धोका संभवत असतो. या मार्गावर वाहतुकीमध्ये वाढ झाली आहे. श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, माणगावसह दक्षिण रायगड, दापोली, मंडणगड या ठिकाणी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असून या घाटामध्ये संरक्षक भिंती नाहीत. अवघड वळणांवर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले पाहिजे ताम्हिणी घाटातील निसर्गरम्य धबधबे तसेच भिरा येथील देवकुंड हे पर्यटकांचे आणि ट्रेकर यांचे प्रमुख आकर्षण झाले आहे. त्यामुळे कोकणात येणारे पर्यटक हे या घाटामध्ये थांबून निसर्गरम्य परिसराचे दर्शन घेऊनच पुढील प्रवास करत असतात. तसेच कोकणात येण्यासाठी हा मार्ग प्रवासाच्या दृष्टीकोनातून जवळचा असल्यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रस्त्याकडेला असणारे उंच डोंगर आणि दरडी कोसळण्याची पावसाळ्यात दाट शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
 
 
या घाटातील खोल दऱ्या हे प्रवाशांचे आकर्षण झाले आहे. या दऱ्या आणि डोंगर रस्त्याच्या कडेलाच असल्यामुळे तेथे काही ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या नसल्यामुळे पर्यटकांना आणि प्रवाशांना धोका जाणवू लागला आहे. ताम्हिणी घाटात सुध्दा अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. या अवघड वळणांवरील खोल दऱ्यांच्या ठिकाणी सबंधित खात्याने रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंतीचे बांधकाम करावे व संभाव्य होणाऱ्या अपघातांपासून प्रवाशी जनतेचे संरक्षण व्हावे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पर्यटक व या मार्गावरील नेहमी प्रवास करणारे प्रवाशी यांच्यातून व्यक्त होत आहेत. त्यामुळे ताम्हणी घाटातील ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तेथे संरक्षक भिंती उभाराव्यात. व कमकुवत झालेले संरक्षण कठडे नव्याने बांधावेत अशी मागणी नागरिक, प्रवासी व पर्यटकातून होत आहे. त्याचबरोबर म्हसळा, माणगाव दरम्यान असणाऱ्या मोर्बा घाट व म्हसळा तालुक्यातील घोनसे घाटात विशेषता पावसाळ्यात दरडी कोसळतात. त्यामुळे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अतिवृष्टीच्या वेळेत काळजी घेणे गरजेचे असून दक्षता बाळगावी, असेही प्रवाशातून बोलताना प्रतिक्रिया येत आहे.