माथेरानला उल्हासनदी येथून होणारा पाणीपुरवठा बंद...

सध्या शार्लोट लेक मधील पाणीपुरवठा ,कामगारांनी पुकारला संप; स्थानिक आदिवासी यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

By Raigad Times    12-May-2022
Total Views |
ulhas river
 
कर्जत | माथेरान नळपाणी योजनेसाठी नेरळ जवळील कुंभे येथे उल्हास नदीवरून होणारा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गेली चार दिवस माथेरान मध्ये होणारा पाणीपुरवठा शार्लोट लेक मधून होत आहे. दरम्यान, माथेरान मध्ये सध्या पर्यटन हंगाम असून पर्यटकांसाठी अधिकच पाणी साठा आवश्यक असल्याने पाणी पुरवठा नेरळ कुंभे येथून होणे महत्वाचे आहे.
 
Water storage in the lake
 
मात्र कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केल्याने चार दिवसापासून कामगारांचा संप माथेरान साठी न परवडणारा असाच आहे. तर दुसरीकडे माथेरान नळपाणी योजनेतून माथेरान डोंगरातील ज्या चार आदिवासी वाद्यांना पिण्याचे पाणी पुरविले जाते त्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
 
माथेरान या पर्यटन स्थळाची नळपाणी योजना तेथील शार्लोट लेक मधील पाण्यावर तसेच नेरळ कुंभे येथे उल्हासनदीचे पाणी जलवाहिनी मधून माथेरान पर्यंत नेण्यात येते.
 
माथेरान डोंगरातून जाणारे जलवाहिनी लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणे नळपाणी योजना तयार करताना कुंभे येथील उद्भव पासून जुम्मापट्टी आणि वॉटर पाईप अशा दोन ठिकाणी जलवाहिनीतून येणारे पाणी वेगाने माथेरान मध्ये जलशुद्धीकरण केंद्र येथे पोहचावे यासाठी पंप हाऊस बनविण्यात आले आहेत.
 
ते पंप हाऊस ऑपरेट करणारे आणि कुंभे येथे पाणी सोडण्याचे काम करण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून स्थानिक तरुण काम करतात. कंत्राटी तत्वावर काम करणारे ते १७ कामगार हे जुम्मापट्टी, माणगाव वाडी, कुंभे येथील स्थानिक भूमिपुत्र आहेत.
 
त्या कामगारांवर माथेरान नळपाणी योजनेचे उल्हासनदी येथून माथेरान येथील पे मास्टर पार्क भागात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचवण्याची जबाबदारी असते.
 
माथेरान नळपाणी योजनेसाठी महत्वाची भूमिका बजावणारे कामगार यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने या कंत्राटी कामगारांनी नळपाणी योजनेचे काम बंद केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे उल्हासनदी येथून माथेरान कडे जाणारे पाणी चार दिवसापासून सोडले गेले नाही.
 
त्याचा परिणाम माथेरान मधील पर्यटन हंगामावर होण्याची शक्यता आहे. कारण सध्या माथेरान मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक असून पिण्याच्या पाण्याची सध्याच्या उन्हाळ्यात वाढलेली मागणी लक्षात घेवून माथेरान शहरात असलेल्या शार्लोट लेक मधील पाणी उचलले जात आहे.
 
त्यामुळे आधीच पाण्याची पातळी खालावलेल्या शार्लोट लेक मधील पाणी दररोज पाणी उचलून आणखी कमी होऊन मोठी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते.
 
त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तात्काळ कंत्राटी कामगारांचा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे. त्या १७ कामगारांनी नेरळ ग्रामपंचायत मधील पंप हाऊस जुम्मापट्टी,कुंभे येथील उद्धव पंप या ठिकाणी कामबंद आंदोलन चौथ्या दिवशी सुरु ठेवले आहे.
 
--------------------------------------------------------------
 
* परिणाम आदिवासी वाड्यांना देखील....
 
माथेरान नळपाणी योजनेच्या जलवाहिन्या नेरळ ग्रामपंचायत मधून जात असल्याने स्थानिक आदिवासी वाद्यांना या जलवाहिनी मधून पिण्याचे पाणी दिले जाते.
 
जुम्मापट्टी, धनगर वाडा, धसवाडी आणि माणगाव वाडी या चार ठिकाणी मागील तीन दिवस पाणी गेले नाही आणि त्यामुळे तेथे पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक आदिवासी लोकांना वणवण भटकावे लागत आहे.
 
* सुरेखा भणगे- प्रशासक, माथेरान गिरिस्थान नगरपरिषद
 
माथेरान मध्ये सध्या पर्यटन हंगाम असल्याने पाण्याची गरज लक्षात घेऊन कुंभे येथून पाणी उचलणे थांबणे हे पर्यटन हंगामासाठी धोक्याचे आहे. मात्र हि योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चालवीत असल्याने त्यांच्या कामगारांचा प्रश्न त्यांनी निकाली काढून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत जीवन प्राधिकरण बरोबर संपर्क केला आहे.
 
तर शहरातील पाणीपुरवठ्याबाबत शार्लोट लेक मध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ काढणायचे काम मंजूर केले असून ते लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
* नितीन सावंत- स्थानिक अभ्यासक
 
ब्रिटिशांनी तयार केलेल्या शार्लोट तलावात पाण्याची स्थिती हि सध्या बिकट आहे. सध्या तलावात जेमतेम ३७ फूट इतका पाणीसाठा असून नेरळ येथून उल्हासनदीवरून येणारे पाणी आले नाही तर शार्लोट लेक मधील पाणी संपून जाईल आणि पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण होऊ शकते.
 
त्यात शार्लोट लेक च्या संवर्धनासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतील कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कामगारांच्या न्याय हक्काचा प्राषन कायम राहिल्यास माथेरान वर मोठे पाणी संकट येऊ शकते
 
* गिरीश पवार-स्थानिक व्यवसायिक
 
शार्लोट लेक मधून आता या उन्हाळी पर्यटन हंगामात पाणी उचलणे धोक्याचे आहे. उल्हासनदीवरून दररोज २० तास पाणी उचलले जाते, तेंव्हा माथेरान मधील पर्यटन हंगामावर परिणाम जाणवत नाही.
 
मात्र चार दिवस कुंभे येथून पाणी उचलले जात नाही हि बाब निश्चित भयावह असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंत्राटी कामगारांचा प्रश्न निकाली काढावा आणि शार्लोट लेक कोरडा होणार नाही याची काळजी घ्यावी.
 
* एस ए भोसले- उपअभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पनवेल
 
त्या १७ कामगारांचा प्रश्न पगाराबद्द;ल असून संबंधित यांना आजच तो प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माथेरान शहरातील शार्लोट लेक मधील पाण्याचा साठा कमी झाला आहे.
 
त्यात सलग आठ दिवस पाणी उचलले गेल्यास लेक कोरडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच कंत्राटी कामगार यांचा प्रश्न मार्गी लावुन पाणी कुंभे येथून उचलण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल.