अलिबाग । मुंबई-गोवा महामार्गावरील उसरघर गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचार्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत 21 मार्च रोजी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील उसरघर गावच्या हद्दीत मृत व्यक्ती (रा. लोणारे, माणगाव) हा वेडाच्या भरात फिरत होता. याचदरम्यान, आलेल्या एका अज्ञात वाहनाच्या चालकाने त्याला धडक दिली आणि अपघात करुन तो पळून गेला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचारी इसमाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अपघात करुन पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम 304अ अन्वये सदोष मनुष्यवधासह भा.दं.वि.कलम 337, 338, मोटार वाहन अधिनियम,1988 चे कलम 184, 134 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण हे करीत आहेत.