रेवदंडा | मुरूड तालुक्यात भोईघर येथे अनाधिकृत सुरू असलेली दगड खाण बंद करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी अलिबाग-रायगड यांचे कडे चौल येथील सुदेश सदानंद राऊळ यांनी केली आहे.
भोईघर येथील मांजरेकर कुटूंबियाच्या नावे असलेली मिळकतीमध्ये ही विनापरवाना दगडखाण सुरू असल्याचा आरोप सुदेश सदानंद राऊळ यांनी उपविभागीय अधिकारी अलिबाग-रायगड यांना दिलेल्या निवेदनपत्रात केला आहे. तसेच ही मिळकत म.ज.स. अधिनियम 1966 अन्वये शर्तीस पात्र असून संबधीत दगड खाणीचे काम करणार्या व्यक्तीने शासकीय नियमाचा भंग केला आहे, त्यामुळे सदर जमिन शासन जमा करावी अशी मागणी त्यांनी केली या निवेदन पत्रात केली आहे.
सदर मिळकतीत सुरू असलेल्या दगडखाणीच्या कामासाठी शासकीय परवानगी आहे, किंवा नाही, कळलेले नसून या जमिन मिळकतीत दगड खाणीच्या कामासाठी सुरूंग लावून दगडे पाडले आहेत. मात्र या जमीन मिळकती नजीक डॅम व अभयारण्य आहे, त्यामुळे ही जमिन इकोसेन्ससिटिव्ह झोन मध्ये येते. त्यामुळे खाणकाम पुर्णपणे निशिध्द असल्याचे म्हणणे सुदेश राऊळ यांचे आहे.
या दगडखाणीच्या गट नंबर 388 लगत, गट नंबर 33/2 ही सुदेश राऊळ यांच्या मालकीची आंबा बागायत मिळकत आहे. सदर दगड खाणीत होत असलेल्या अनाधिकृत कामाने आंबा बागायतीचे नुकसान होत आहे, तसेच दगड खाणीचे काम करण्यासाठी अनाधिकृत रित्या विनापरवानगी जबरदस्तीने ट्रकची वाहतुक चालू असून याबाबत त्यांनी लेखी तक्रार पोलिस ठाणेकडे केली आहे. मात्र याबाबत कोणतीही कारवाई अदयापी झाली नसल्याचे सुदेश राऊळ यांनी तक्रार निवेदनात म्हटले आहे.
या दगड खाणीची तेथील जवळपास असलेल्या मिळकत मालकांशी समक्ष संपर्क करून व या तक्रार निवेदन अर्ज विचारात घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी कार्यालयीन चौकशी करून खाण काम बंद करावे अशी मागणी सुदेश राऊळ यांनी केली आहे.
भोईघर परिसरातील या कथाकथील दगडखाणी परिसरात बोर्ली मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांनी भेट देऊन पहाणी केली असता, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दगडखाणीचे उत्खन्नन काम सुरू असल्याचे दिसून येत नसल्याचे मुरूड तहसिलदार रोशन शिंदे यांनी याबाबत संपर्क केला असता सांगितले.