अर्धवट तुटलेला वीज खांबामुळे एका चारचाकी गाडीचे झाले नुकसान

महावितरणाचे अक्षम्य दुर्लक्ष

By Raigad Times    02-Dec-2022
Total Views |
Sudhagad Accident
सुधागड -पाली | सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा, टाटाचा माळ येथे अर्धवट तुटलेल्या विजेच्या खांबामुळे एका चारचाकी गाडीचे नुकसान झाले होते. येथे लोखंडी खांब बदलून नवीन सीमेंटचा खांब लावण्यात आला आहे. परंतु लोखंडी खांब रस्त्याच्या दिशेने मान टाकून असल्याने चारचाकी गाडीचा पत्रा कापला गेला. या विजेच्या खांबाकडे महावितरणाने दुर्लक्ष केले असून एखादा मोठा अपघात होऊन जीव जाण्याची महावितरण वाट बघत आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
 
टाटाचा माळ येथे रस्त्यालागतच दर्शनी भागात हा खांब असून हा लोखंडी खांब अर्धवट कापलेल्या स्थितीत 4 एक वर्ष आहे. रात्रीचे पथदिवे आपलं तोंड लपवतात तेव्हा तर तो अत्यंत धोकादायक असून तो विजेचा खांब एखाद्याचा बळी घेऊ शकतो. एखाद्याचा अपघात झाला किंवा बळी गेला तर अपराधी कोण? विजेचा खांब की दुर्लक्ष करणारे अधिकारी? याची चिंता नागरिकांना लागून राहिली आहे.