कोर्लई : मुरूड तालुक्यातील एकदरा गावात एका दिवसात पिसाळलेल्या गाईच्या हल्यात पाच जण जखमी झाले आहेत. गेले तिन दिवस ही गाय दिसेल त्या पुरुष, स्त्रीयांवर, मुलांवर हल्ले करत आहे. तिन दिवसांत १२ जणांवर या गाईने हल्ला केला आहे. या वाढलेल्या प्रकारानंतर गावकऱ्यांनी जोखीम घेऊन या गाईला जेरबंद केले.
आज सकाळी एकदरा परिसरात सकाळी ६:३० वाजत माॅर्नींग वाॅक करुन येताना भंगार वाल्यांच्या परिसरात गाईंचा कळप होता. त्यात एक गाय कुत्रा चावल्याने पिसाळलेली होती. गेले दोन दिवस ही गाय दिसेल त्या पुरुष, स्त्रीयांवर, मुलांवर हल्ला करून जखमी करत होती. आज तिसऱ्या दिवशी माॅर्नींग वाॅक करुन परतनाऱ्या पत्रकार संतोष रांजणकर यांच्यावर या गाईने हल्ला केला होता. त्यावेळी स्वतःचा जिव वाचवण्यासाठी पळताना जोरात आपटल्याने ते जखमी झाले आहेत .
त्यानंतर या गाईने कोळंबी सोलत असलेल्या कोळी महिलेवर हल्ला केला व तिलाही जखमी केले. या परिसरात गोमुख कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मुलीला जखमी केले. त्यानंतर या गाईने एकदरा पुलावर अशोक शापुरकर यांच्यावर हल्ला करत असताना त्याने पुलाच्या कठड्यावरुन स्वतःचा जिव वाचवण्यासाठी लोंबकळत राहिल्याने तो सुद्धा जखमी झाला.
सदर या प्रसंगामुळे अखेर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या गाईला जेरबंद केले. ही गाय कुत्र्यांनी चावल्याने पिसाळलेली होती. त्यामुळे ही सर्वांवर हल्ला करत असल्याचे समजते. सदर गाईला तिचे मालक डोंगरी गावातील उत्तम चाफिलकर यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.