उरण । उरण येथून पनवेलला गेलेल्या दोन जिवलग मित्रांचा परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात जागच्या जागी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताने आवले गावाने दोन उमदे तरुण गमावल्याने गावात शोककळा पसरली आहे.
उरण तालुक्यातील आवरे गावातील मोहिंदर गावंड आणि अलंकार पाटील हे दोघे तरुण मंगळवारी (दि22) कामानिमित्त पनवेल भागात गेले होते. रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना त्यांच्या गाडीला पळस्पे भागात भीषण अपघात झाला त्यात दोघेही जागच्या जागी ठार झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुरा झाला असून या दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यात दोघांचा ही मृत्यू झाला आहे.
या अपघातात जीव गमावलेल्या दोघांना ही दोन दोन लहान मुले आहेत. अपघातातील मोहिंदर गावंड हा कस्टम क्लिअरिंग एजंट म्हणून काम करीत होता तर अलंकार नारायण पाटील हा पर्ल फ्रेट सर्व्हिसेस मध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी करीत होता.
शालेय जीवनापासून अतिशय जीवलग मित्र असलेल्या या दोघांचा मृत्यू ही एकत्रित एकाच वेळी झाला असल्याने आवरे गाव हळहळला आहे.