जेएनपीटी । चिरनेरच्या बेलडोंगरी परिसरात वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या माध्यमातून वृक्षलागवड आणि संवर्धन कार्यक्रम 25 सप्टेंबर रोजी चिरनेर जंगल सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. यावेळी 10 हजार फळझाडे लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेने 400 हुन अधिक देशी, विदेशी फळझाडांची लागवड केली आहे. यामध्ये आंबा, जांभूळ, चिकू, पेरु, आवळा, चिंच, सिताफळ अशा विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था ही गेली 21 वर्षे निसर्ग वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जंगलात लागलेल्या आगी विझविण्यासाठी वन विभागाला मोठा हातभार लावण्याचे काम करीत आहे.
शनिवारी (25 सप्टेंबर) आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमाला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत, साई देवस्थानचे अध्यक्ष रविंद्र पाटील, नवक्षेत्रपाल शशांक कदम, वनपाल डी.डी. पाटील, संतोष इंगोले, किरीट पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, वटवृक्ष संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून, झाड लावले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी, उपाध्यक्ष आनंद मढवी, काशीनाथ खारपाटील, मनोहर फुंडेकर, दिलीप मढवी, सुनील नाईक, अभिमन्यू पाटील, दिनकर पाटील, संतोष पाटील, जगन्नाथ पाटील, पंकज घरत, बाळा कोळी, आदी सदस्यांनी मेहनत घेतली.