म्हसळा येथील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By Raigad Times    25-Sep-2021
Total Views |
mhasala_1  H x
 
अतिवृष्टीमुळे झाले होते मोठे नुकसान
 
म्हसळा | म्हसळा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३५०० मि.मि. असून आजपर्यंत ३८२० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीततालुक्यात झालेले पर्जन्यमान, यावेळी सोसाट्याचा वारा-वादळ झाल्याने घर, गोठे यांच्या पडझडी झाल्याची माहिती महसूल विभागाकडून समोर येत आहे. यावर्षी शेती-फळबागायतींची नुकसान सोडून तालुक्यातील अनेक गावांतून ३५ लाभार्थांचे सुमारे १० लाख ८८ हजार २६५ रक्कमेचे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील नागरिकाना मदतीची अपेक्षा असून शासनाकडून अद्यापही कोणत्याही सकारात्मक हालचाली दिसत नाही.
 
तालुक्यातील म्हसळा, घोणसे, गणेश नगर, सुरई, काळसुरी, मेंदडी, कुडगांव, पेढांबे, वारळ, कांदळवाडा, संदेरी, आगर वाडा, साळविंडे, सोनघर, तुरूंबाडी, दुर्गवाडी, तोंडसुरे (जंगमवाडी), पांगळोली या महसुली गावांतील ३५ लाभार्थींचे सुमारे रु १० लाख ८८ हजार २६५ रक्कमेचे आर्थिक नुकसान झाल्याचे महसुली पंचनामे झाले आहेत. बहुतांश लाभार्थींचे छतावरील कौलेकोने, सिमेंट व स्टीलचे पत्रे, वासे, पडवी, भिंत अतिपावसाने कोसळल्याच्या घटना घडल्याचे विविध ग्रामस्थांनी सांगितले.
------------------------------------------------------------------------------------------------------ 
हवामानातील बदलामुळे ग्रामीण भागातील शेतकरी ग्रामस्थांचे मागील २-३ वर्षांत निर्सग व ताऊक्ते वादळ, कोविडमुळे आलेली आर्थिक मंदी यामुळे शासनाने तात्काळ मदत करावी. - महादेव पाटील, - माजी सभापती, पं.स. म्हसळा