जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये आज स्वच्छता महाश्रमदान उपक्रम राबविणार
अलिबाग | भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) २ अंतर्गत १५ सप्टेंबरपासून जिल्ह्यात स्वच्छ्ता सेवा अभियाना अंतर्गत गावे स्वच्छ, सुंदर करण्यावर भर दिला जात आहे. या अभियान अंतर्गत बुधवारी (ता.२२) सकाळी ७ ते १२ या वेळेत सर्व गावांमध्ये स्वच्छता महाश्रमदान दिन उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी दिल्या आहेत.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) २ अंतर्गत भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयातील सर्व गावामध्ये विविध २५ ऑगस्ट पासून पुढील १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान राबविण्यात येत आहे. तसेच १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान सुरु आहे. याच अनुषंगाने जिल्हयात बुधवारी सर्व गावांमध्ये स्वच्छता महाश्रमदान दिन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महाश्रमदान दिनात गावातील सर्वच ठिकाणाची साफ सफाई करणे, झाडलोट करणे, कचरा संकलन व वर्गी रण करणे, कचरा व्यवस्थापन करणे, पाण्याचे स्त्रोतांच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे.
तसेच शोषखड्डा निर्मीती करणे, प्लास्टीक कचरा स्वंतत्र ग ोळा करणे व प्लॅस्टिक संकलन केंद्रात पाठविणे किंवा रिसायकलिंगसाठी पाठविणे तसेच प्लास्टिक व्यतिरिक्त इतर कचरा वेगळा गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात येईल. या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, गावातील सर्व ग्रामस्थ, महिलामंडळे, बचतगट, गणेश मंडळे, विविध सामाजिक संस्था, नेहरू युवा केंद्र यांचा सक्रीय सहभाग घेऊन गावे शाश्वत स्वच्छ केली जाणार आहेत.
या महाश्रमदान दिनानिमित्त देखरेख व संनियंत्रण करणे व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करिता जिल्हास्तरावरुन प्रत्येक तालुक्याकरिता संपर्क अधिकारी असलेले जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख हे स्वच्छता महाश्रमदान दिनी तालुका, गावस्तरावर भेटी देणार आहेत. तसेच श्रमदान करताना कोरोनाचे नियम पाळून श्रमदान करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.