मुंबई-गोवा महामार्गवर धुळीचे साम्राज्य

27 Aug 2021 15:54:23
kolad_1  H x W:
 
प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
 
गोवे/कोलाड | मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाकोलाड, खांब, सुकेळी, वाकण या मार्गावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकासह प्रवासीवर्ग पूर्णपणे त्रस्त असतांना हेखड्डे बुजविले जात असून या खड्ड्यात मातीमिश्रित खडी टाकल्याने पाऊस पडताच या महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते.
 
या मार्गावरून चालतांना पादचारी ही पूर्णपणे त्रस्त झाले होते. चार ते पाच दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्ग पूर्णपणे सुकले असून याचे रुपांतर धुळीत झाले आहे. ही सर्व धूळ प्रवाशांच्या व महामार्गावरील परिसरात असणार्‍या गावातील नागरिकांच्या अंगावर उडत आहे. यामुळे येथील नागरिकांच्या व प्रवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही धूळ नागरिकांच्या नाका तोंडात जाऊन सर्दी, खोकला, व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरी करणाचे काम गेली अकरा ते बारा वर्षांपासून अतिशय मंद गतीने सुरु असुन हे काम केव्हा पूर्ण होईल? याची खात्री देता येत नाही; परंतु पाऊस पडला तर या मार्गावर चिखल व खड्डे यामुळे प्रवासी वर्ग त्रस्त होतात. यामुळे कंबरदुखीसारखे आजार तर पाऊस बंद झाल्यावर धुळीमुळे खोकला, सर्दी यासारखे आजार होतांना दिसत आहेत.
 
टु-व्हीलरवरुन प्रवास करणार्‍यांना तर सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत असून उडणारी धूळ प्रवाशांच्या डोळ्यात उडत आहे. यामुळे अपघातही होतांना दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल? असे वाटत असतांना नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले; परंतु अकरा ते बारा वर्षे रस्त्याचे काम सुरु असून अद्याप हे काम पूर्ण झाले नाही. शिवाय एक खड्डा भरण्यासाठी आठ दिवसांतून चार ते पाच वेळा भर टाकली तरी खड्डा भरेना अशी अवस्था आहे.
 
गणेशोत्सव जवळ आला असून या महामार्गावरून लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात गावाकडे येत असतात; परंतु या रस्त्याच्या धुळीमुळे व खड्डयांमुळे गणेश उत्सवात विघ्न येतांना दिसत आहे. शिवाय खड्ड्यात टाकलेली मोठमोठी खड्डी रस्त्यावर पसरलेली आहे. यामुळे अनेक प्रकारची वाहने पंक्चर होतांना दिसत आहेत.
 
जागोजागी खड्ड्यात टाकलेल्या खडीवर डांबर टाकून खड्डे भरावे; अन्यथा हेच खड्डे व धूळ वाहनचालक तसेच प्रवासीवर्गाच्या जीवावर उठतील. यामुळे चार ते पाच दिवसांत कोलाड ते वाकण दरम्यान डांबर टाकून खड्डे भरावे. यामुळे गणेश उत्सवासाठी येणार्‍या प्रवासी वर्गाचे विघ्न तरी कमी होतील, असे प्रवासीवर्गातून बोलले जात आहे.
Powered By Sangraha 9.0