बोर्लीपंचतन येथील चिंचबादेवी मंदिर तिर्थक्षेत्र विकसित करणार

By Raigad Times    19-Jun-2021
Total Views |
Shrivardhan_Borlipanchtan
 
  • खा.सुनील तटकरे यांची ग्वाही
  • मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
बोर्लीपंचतन । बोर्लीपंचतन गावचे ग्रामदैवत असलेल्या चिंचबादेवी मंदिरासाठी महाराष्ट्र राज्याच्या तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून सागरी महामार्गामुळे व दिघी पोर्टमुळे ह्या भागाला विशेष महत्व प्राप्त होईल, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.
 
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील ग्रामदेवता चिंचबादेवी मंदिराकडे जाणार्‍या रस्ता नुतनीकरणासाठी 20 लाखांचा निधी मंजूर झाला असून, आज (19 जून) या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
 
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावाची ग्रामदेवता चिंचबादेवी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची अनेक वर्षांपासून दूरवस्था झाली होती. हा रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत होती. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सन 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधी यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यासाठी 20 लाख रुपये व दांडगुरी गावची ग्रामदेवता सावराई देवी मंदिराकडे जाणारा रस्ता व संरक्षक भिंत बांधण्यासाठी 20 लाख रुपये असा एकूण 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Shrivardhan_Borlipanchtan 
 
या कामाचे भूमिपूजन आज खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महंमद मेमन, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, महिलाध्यक्ष ज्योती परकर, सरपंच नम्रता गाणेकर, चिंचबादेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुजित पाटील, उपसरपंच संतोष पयेर, माजी उपसरपंच मन्सूर गिरे, प्रकाश तोंडलेकर, मंदार तोडणकर, लीलाधर खोत, ग्रामपंचायत सदस्य-सदस्या, देवस्थान समिती उपाध्यक्ष विजय मोरे, माजी उपाध्यक्ष उत्तम दिवेकर, सचिव विक्रांत शिरकर, खजिनदार शंकर गाणेकर, सहखजिनदार परशुराम दिवेकर, माजी अध्यक्ष गणेश पाटील, गणपती देवस्थान समिती अध्यक्ष सुशील पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष गायकर, सूचिन किर, माजी सभापती लाला जोशी, मीना गाणेकर, सर्व समाजाध्यक्ष व पदाधिकारी व इतर उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, मी नगरविकास मंत्री असताना हसन मुश्रीफ आमदार होते. त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझी मदत होती. यावेळी सर्व निधी जवळपास संपला होता. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असल्याने व त्यांच्यासोबतच्या निकोप मैत्रीमुळे त्यांच्याकडे मी दोन कामांच्या निधीसाठी मागणी केली. त्यानुसार त्यांनी निधी उपलब्ध करुन दिला.
 
दिघी पोर्ट आता नवीन उद्योजकाकडे हस्तांतरीत झाले असल्याने रखडलेला विकास जोमाने होईल. रोजगाराची संधीदेखील उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे सागरी महामार्गही आपल्या भागातून जाणार असल्याने पर्यटनात सकारात्मक बदल होऊ शकेल. महाराष्ट्र शासनाच्या या पर्यटन विकास कार्यक्रमातून चिंचबादेवी मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार करु, असेही खा.तटकरे यांनी सांगितले.