अलिबाग : शेकापचे आंबेपूर माजी सरपंच शैलेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

10 Jun 2021 17:22:31
Shivsena_Alibag_Pakshprav
 
आ.महेंद्र दळवी यांनी केले स्वागत
 
अलिबाग । शेकापचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे, आंबेपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शैलेश पाटील यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
 
बांधण येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, संतोष निगडे, विभागप्रमुख योगेश जुईकर, तालुका संघटक सतिश पाटील, पोयनाड विभाग संघटक महेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते नंदु पाटील, पोयनाड उपविभागप्रमुख महेश वाघ, पोयनाड उपविभागप्रमुख विकास निळकर, उद्योजक रत्नाकर पाटील, युवा प्रमुख संकेत पाटील उपस्थित होते.
 
पोयनाड ते सांबरी हा भाग एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला मानला जात होता. गेल्या सात-आठ वर्षांपासून आ.महेंद्र दळवी व शिवसेनेचे अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी यांनी या विभागात अनेक विकास कामे केली असून, कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेची घोडदौड सुरु आहे.

Shivsena_Alibag_Pakshprav 
 
या विभागात शैलेश पाटील हे गेली पंचवीस वर्षे शेकापचे प्रमाणिकपणे काम करत होते. त्यांनी येथील तळागाळातील माणसांपर्यंत जनसंपर्क ठेवला. लोकांची सेवा करताना पक्ष वाढविण्याचे काम केले; परंतु शेकाप नेत्यांनी याची दखल घेतली नाही. गेले अनेक महिने पक्षात त्यांची घुसमट होत होती. अखेर शैलेश पाटील यांनी शेकापला रामराम करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Shivsena_Alibag_Pakshprav 
 
यावेळी बोलताना आ. महेंद्र दळवी यांनी शिवेसेनेमध्ये प्रवेश करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाने वागणूक दिली जाईल, असा शब्द दिला. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे शिवसेनेचे समीकरण आहे. यानुसार अलिबाग तालुक्याचा आमदार म्हणून पक्षीय संघटनेतून ‘गाव तेथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Shivsena_Alibag_Pakshprav 
 
शिवसेनेचा शिलेदार म्हणून पक्षवाढीबरोबरच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही आ.महेंद्र दळवी यांनी सांगितले. दरम्यान, शैलेश पाटील यांच्या प्रवेशामुळे या विभागात शिवसेनेला बळ मिळणार असून, पक्षवाढीस निश्चित मदत होईल, असा विश्वास तालुकाप्रमुख राजा केणी यांनी व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0