रायगड जिल्हा परिषदेने जलसंपदा विभागाची घेतली मदत
अलिबाग । अलिबाग तालुक्यातील सुमारे 65 गावांना पाणी पुरवठा करणार्या उमटे धरणातील गाळ काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. रायगड जिल्हा परिषदेकडून याकामी जलसंपदा विभागाची मदत घेतली जाणार आहे.
उमटे धरणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे ऐरणीवर राहिला आहे. जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यापासून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यापर्यंत सर्वच कामांचा खेळखंडोबा झाला आहे. गढूळ पाण्याचा पुरवठा येथून केला जातो. गाळाने भरल्यामुळे पाणी असूनही चिखलयुक्त, दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा या विषयावर बोलले गेले आहे. स्थानिक नागरिकांनीही आवाज उठवला आहे. आतादेखील उमटे धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी यांत्रिक विभाग-पुणे आणि नाशिक यांच्याकडे पत्रव्यवहार केला.
उमटे धरणामध्ये साधारणतः 38 हजार 500 क्युबिक क्विंटलचा गाळ साचलेला आहे. तो काढल्यास उन्हाळ्यात अखेरपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होईल. त्यामुळे आपल्याकडील यंत्रसामुग्री धरणातील गाळ काढण्यासाठी उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीला यांत्रिक विभागाने प्रतिसाद दिला असून आज (21 मे) त्यांच्या दोन अधिकार्यांनी धरणावर येऊन पाहणी केली.
या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची यंत्रसामुग्री सध्या अहमदनगर येथे आहे. तेथून उमटे धरणावर पोहचेपर्यंत दोन ते तीन दिवस लागतील. त्यानंतर साधारण पाऊस सुरु होईपर्यंत हा गाळ उपसा करण्याचे काम करता येईल. दरम्यान, 40 वर्षांनंतर पहिल्यांदाच उमटे धरणातील गाळ काढला जाणार आहे. प्रत्यक्षात गाळ काढल्यानंतर तरी शुध्द आणि पुरेसा पाणीपुरवठा या परिसरातील नागरिकांना उपलब्ध होईल, ही अपेक्षा.