मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले

20 Apr 2021 17:00:21
Mangaon Road News_1 
 
बाधित शेतकरी मोबदल्याच्या प्रतिक्षेत, केंद्राची उदासीनता
 
माणगांव । कोकणातून साऊथला जाणााया महामार्गाच्या रूंदीकरणामुळे कोकण-गोवा येथील पर्यटनातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होईल व कोकणातील विकासाला मोठी चालना मिळेल त्याचबरोबर नवनविन उद्योग कोकणात येतील. व कोकणला कॅलिफोर्निया म्हणून नवी ओळख मिळेल अशी नागरिकांना अशा वाटत होती. महाराष्ट्राची अर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. या राजधानीतून कोकण-गोवा-साऊथला जोडणारा हा महामार्ग लाईफ लाईन म्हणून नजीकच्या काळात नवा जन्म घेणार आहे. त्यामुळे हा महामार्ग कोकण वासीयांची अस्मिता जपणारा असून त्याची गेली अनेक वर्शापासून वाताहात सुरूच आहे. या मार्गावर अनेक प्रवासी पर्यटकांचे, अपघातात प्राण गेले. तरीही हा मार्ग अपूर्णच राहीला. केंद्रसरकारच्या उदासीन धोरणामुळे केंद्राच्या अखत्यारीत असणार्‍या वनजमीन हस्तांतराचा मुद्दा आजही प्रलंबित आहे. तर केंद्राचा निधी भुसंपादनासाठी काही बाधीत शेेतकार्‍यांना मिळाला नसल्याने विकासाच्या महामार्गाला निधीचा वेळोवेळी ब्रेक लागत गेला. त्यामुळे कोकणातून-गोवा-साऊथला जाणार्‍या महामार्गाची उपेक्षा कायम राहीली. हा महामार्ग कधी होणार हा प्रश्‍न, प्रश्‍नच राहिला.
 
पळस्पे फाटा ते इंदापूर या पहिल्या टप्याचे काम अनेक ठिकाणी रखडले असतानाच दुसर्‍या टप्याचे काम इंदापूर ते कशेडी घाट शासनाने हाती घेतले या दरम्यान रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी वनजमिन, मालकी शेतकर्‍यांच्या जमिनी यांचे कुठे भूसंपादनाची प्रक्रिया तर कुठे मंजुरीची प्रक्रिया यामुळे रोडावले आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे या शहरातून महामार्गाचे रूंदीकरणाचे काम करण्यात येणार असून गेले अनेक दिवस येथील बाधीत होणार्‍या नागरिकांना शासनाकडून मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे या रूंदीकरणाचे काम रखडले होते. मात्र शासनाने त्यानंतर लोणेरे बाजारपेठेतील काही नागरिकांना नुकसान भरपाई मोबदला दिला. काही नागरिक या मोबदल्यापासून वंचीत आहेत. त्यामुळे रस्ता रूंदीकरणाचे काम रखडले आहे. तर रस्त्यालगत असणारी पाईप लाईन, इलेक्ट्रीक खांब, रस्त्यालगतच्या गटाराचे काम जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत लोणेरे बाजारपेठेतून रस्ता रूंदीकरणाचे कामाचे भिजत घांगडे पडणार आहे. शासन रूंदीकरणासाठी पाऊल कधी टाकणार हा प्रश्‍न नागरिकांपुढे उभा आहे.
 
लोणेरे येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाकडे जाणााया मार्गावर भूयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. तर गोरेगावकडे जाणार्‍या मार्गावर छोटा उड्डाण पूल होणार आहे. लोणेरे बाजारपेठेतील ज्या नागरिकांची घरे, दुकान, शेड, गाळे, जमिन रूंदीकरणात जाणार आहे. त्या 80 टक्के बाधीत नागरीकांना दिपावली पूर्वीच मोबदला शासनाकडून देण्यात आल्याचे माणगांव उपविभागीय कार्यालयातून सांगण्यात आली. वीस टक्के नागरिकांचा मोबदला प्रश्‍न प्रलंबित आहे. मोबदल मिळालेल्या अनेक नागरिकांनी आजही आपली मिळकत खाली करून राष्ट्रीय महामार्गाला ताबा दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. लोणेरे शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 चौपदरीकरणासाठी नव्याने करण्यात आलेल्या भूसंपादनामध्ये येत असलेल्या बांधकाम, जमिन यांचा मोबदला प्राप्त झाला आहे. नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाकरीता बाधीत बांधकामे, जमिन तत्काळ खाली करून शासकीय कामात सहकार्य करावे. जेणे करून राष्ट्रीय महामार्गाचे वेळेत पूर्ण करणे शक्य होईल अशा विनंतीची नोटीस लोणेरे महामार्गालगत राष्ट्रीय महामार्ग विभागाने लावली आहे. या रस्ता रूंदीकरणाचे काम कधी होणार हा प्रश्‍न दिवसेंदिवस जटिल बनला आहे.
Powered By Sangraha 9.0