बागायतदाराचे पावणेदोन लाखांचे नुकसान
पाली/बेणसे । सुधागड तालुक्यात आगीच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी सुधागड तालुकाध्यक्ष यशवंत राघो पालवे यांच्या फळबागेला लागलेल्या आगीत, आंबे, काजू, चिकू, पेरु आदी फळझाडांसह पेंढा जळून मोठे नुकसान झाले.
या घटनेची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. माणगांव खुर्द येथे यशवंत पालवे यांच्या मालकीच्या गट नं. 30 मध्ये फळबाग आहे. या फळबागेला दुपारच्या सुमारास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली? हे अजूनही समजलेले नाही.
मात्र या आगीत 70 आंब्याची झाडे, बोअरवेल व ठिंबक सिंचन पाईप लाईन, 10 चिकूची झाडे, 8 पेरूची झाडे, 6 काजूची झाडे, पाच हजार भाताचा पेंढा व लाकडी माच जळून 1 लाख 48 हजारांचे नुकसान झाले आहे.
या सर्व नुकसानीचा पंचनामा पाली पोलिसांनी केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक विजय तायडे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस नाईक के. एन. भोईर हे करीत आहेत.