8 हजार 729 ग्राहकांनी थकबाकी जमा केली
अलिबाग : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात वीज देयके थकल्याने महावितरणने थकबाकीदारां विरोधात कारवाईला सुरवात केली आहे. अलिबाग विभागात या कारवाई अंतर्गत तब्बल ८ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. ८ हजार २८९ ग्राहकांनी थकलेली वीज देयके भरली आहेत .
गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे जवळपास सहा महिने वीज देयके मोठ्या प्रमाणात थकली. अलिबाग विभागात १४ हजार ४४० ग्राहकांची १३ कोटी १४ लाख रुपयांची वीज देयके थकली होती. यातील पाठपुरावा केल्या नंतर ८ हजार ७९० ग्राहकांनी ८ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी जमा केली आहे.
तर उर्वरीत थकबाकीदारांकडून सक्तीने वीज वसूली करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. अलिबाग विभागा आंतर्गत आत्ता पर्यंत २ हजार ७२९ ग्राहकांची वीज तोडण्यात आली. त्यांच्याकडून २ कोटी २३ लाख रुपयांची वसूली करण्यात आली. अजूनही २ हजार ९०० ग्राहकांनी थकीत वीज देयके भरलेली नाहीत. त्यांच्यावर येत्या कारवाई करण्याची प्रक्रीया सुरु आहे. त्यांच्याकडून ५ कोटी ३ लाख रुपयांची वसूली होणे शिल्लक आहे. ११ टक्के व्याज दराने ही वसूली केली जाणार असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी दिली