अलिबाग । कोरोना काळात अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली. दोन दिवसांपर्यंत बोलत असलेली व्यक्ती अचानक सोडून गेल्याच्या अनेक घटना आहेत. गेलेला माणूस आता परत येणे नाही मात्र अशा मृतांच्या नातेवाईकांना सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे.
कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य मिळणार असून त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. हे अर्थसाह्य मिळवण्यायाठी
http://mahacovid19relief.in/ या संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात करोनामुळे 4 हजार 574 जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृतांच्या वारसांना शासनाकडून 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासाठी जवळपास 22 कोटी 87 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मदत दिली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत करोना 1 लाख 71 हजार 987 जणांना करोनाची लागण झाली होती. यापैकी 1 लाख 67 हजार 178 जण उपचारानंतर बरे झाले. 4 हजार 574 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर उपचाराधीन 235 रुग्ण आहेत.
करोनामुळे दगावलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. याबाबतचे शासन आदेश नुकतेच निघाले आहेत. त्यामुळे करोनामुळे दगावलेल्या 4 हजार 574 रुग्णांच्या वारसांना शासन आदेशाप्रमाणे प्रत्येकी 50 हजारांची रक्कम मिळू शकणार आहे.
राज्य आपत्ती निवारण निधीतून ही रक्कम थेट मृतांच्या वारसांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून एक पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय आणि सेतू कार्यालयाच्या माध्यमातून मृतांच्या वारसांना अर्ज करता येणार आहे.