उरण | निळकंठ कोळी हा उरण तालुक्यातील मोरा कोळीवाडा येथील राहणारा पहिला बोट कॅप्टन झाला आहे. मोरा गावातील नारायण बुधाजी कोळी व निर्मला नारायण कोळी यांच्या सुपूत्र आहे.
या गावात विशेष करुन जास्त वस्ती कोळी समाजाची आहे. पारंपारिक मासेमारी करुन उपजीविका करणे हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. मोरा गाव तसे मुंबईला समुद्रमार्गे जवळ आहे. अवघ्या पाऊण तासात मोर्याहून मुंबईला जलवाहतुकीने पोहचता येते.
उरण शहरातच गावाचा समावेश होत असल्याने चांगला विकास झालेला पहायला मिळतो. आधुनिकीकरण आणि शिक्षणात मोरा गाव पुढे आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलावर शिक्षणाचा संस्कार करतात. त्यातून पुढील पिढी उच्चशिक्षीत होत आहे.
याच अनुषंगाने मोरा गावातील नारायण बुधाजी कोळी व निर्मला कोळी यांनी आपल्या मुलांवर शिक्षणाचे संस्कार केले. त्यातून निळकंठ नारायण कोळी हा त्यांचा मुलगा उच्चशिक्षित होऊन कॅप्टन झाला.
निळकंठ कॅप्टन झाल्यानंतर जहाजावर रुजूही झाला आहे. आपल्या ताब्यातील जहाज घेऊन निळकंठ सिंगापूर ते दक्षिण अमेरिका असा समुद्रमार्गे प्रवास करीत आहे.