अलिबाग । रायगड जिल्हा परिषद आगामी निवडणूकी शेकापसोबत युतीची शक्यता जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी फेटाळली आहे. जिल्ह्यात भाजपचे तिन आमदार आहेत त्यामुळे पुर्ण ताकदीने हि निवडणूक लढवून जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोमवारी अलिबाग येथे भापजकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना, आ. प्रशांत ठाकूर याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली. राज्यात महाआघाडी असल्यामुळे सर्व पक्ष विरुध्द भाजप अशी परिस्थिती रायगडात आहे.
शेकापदेखील या आघाडीचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती होण्याची कुठलीच शक्यता नसल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.
राज्यात महाआघाडी असली तरी यामध्ये शेकापचे स्थान दुयम आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी शेकापसोबत सत्तेत असली तरी, प्रत्यक्ष निवडणूकीत कोण कोणासोबत असणार आहे याचा अंदाज कोणालाच लागत नाही. त्यातच खासकरुन पेणमध्ये शेकाप आणि भाजपमध्ये काहीतही इश्कबाजी सुरु असल्याची चर्चा आहे.
याबाबत जेव्हा जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांना पत्रकारांनी छेडले तेव्हा ती शक्यता फेटाळून लावली. भाजपचे पनवेल, उरण आणि पेण या तिन मतदारसंघात आमदार आहेत. तसेच राज्याचा कारभार हाकण्यात महाआघाडी सरकार पुर्णपणे अपयशी ठरली आहे. आम्ही जनतेचा विश्वास संपादन करत असून यामुळे भाजपला आगामी निवडणूकीत चांगले यश मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.