म्हसळा | दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावर म्हसळा तालुक्यातील वरवठणे गावानजीक भरधाव कारने महिलेला चिरडले. या दुर्घटनेत ५८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (१७ ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कारचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनिता जानू कोठावळे (वय ५८) असे मृत महिलेचे नाव आहे. रेवली येथे राहणार्या वनिता या रविवारी सायंकाळी वरवठणे येथील इनायत कादरी यांच्या फ्लोअर मिलमधून दळण घेऊन रेवलीच्या दिशेने जात होत्या. यावेळी दिवेआगरवरुन महाडच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कारने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन वनिता यांना उडवले.
या अपघातात वनिता कोठावळे यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा विनायक जानू कोठावळे (वय ३०) याने अपघाताची माहिती म्हसळा पोलिसांना दिली. याप्रकरणी कारचालक किशोर भगवान पवार (वय ४०, सध्या रा.प्रभात कॉलनी महाड, मूळ रा.नेवरगाव, ता.गंगापूर जि. औरंगाबाद) याच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वनिता कोठावळे यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अशा अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.