पिण्याच्या पाण्यासाठी तरूणांचे डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन
प्रदिप मोकल/पेण । पेण तालुक्यातील कासु-गडब विभागातील सर्वच गावांना गेले काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे प्रत्येक गावातील महिला एक ते दोन किलोमीटर आंतर मिळेल तसे पिण्याचे पाणी आणत आहेत. महिलांचा तर पूर्ण दिवस पाणी आणण्यास जात आहे.
या भागातील जनतेला सुरळीत मुबलक पाणी पुरवठा व्हावा या साठी येथील तरुण चैतन्य पाटील, नंदकुमार जांभुळकर यानी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कासु येथून डोक्यावर हंडा घेवुन जावुन उपविभागिय अधिकारी, तहसिलदार पेण यांना निवेदन दिले.
या विभागासाठी जेडब्ल्यू कंपनीचे पाईप लाईनमधुन गेले तीस वर्षापासून पाणी मिळत आहेत मात्र ही पाईपलाईन जीर्ण झाल्याने काही ठिकाणी तुटलेली आहे. परिणामी या भागातील लोकांना पाईप लाईनमधून पाणी पोहोचत नाही. तर कंपणीने येथील जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी दुसरी पाईप लाईन टाकली आहे परंतु या पाईप लाईनवरुन पाणी पुरवठा होत नसल्याने येथील जनतेला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
येथील पाणी प्रश्नासंदर्भात पेण येथील उपविभागिय कार्यालयात आ. रविंद्र पाटील यांचे उपस्थित बैठक घेण्यात आली या बैठकीला उपविभागिय अधिकारी विठ्ठल ईनामदार, तहसिलदार अरुणा जाधव, गटविकास अधिकारी सी. पी. पाटील, जेएसडब्ल्यू कंपनीचे महाव्यवस्थापक जनसंर्पक बळवंत जोग, पाणी पुरवठ्याचे अधिकारी, जिल्हापरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य गजानन बोरकर, वडखळ सरपंच राजेश मोकल, दिनेश म्हात्रे, संदिप कडु, संदिप म्हात्रे आदिसह विभागातील सरपंच ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत जेएसडब्ल्यूची जुनी पाईप लाईन त्वरीत दुरुस्त करुन पाणी पुरवठा सुरळीत करावा, नविन पाईप लाईन लवकरात लवकर सुरु करावी, जिवन प्राधिकरणाची योजना सुरु करावी, तातडीने टँकरद्वारे या भागातील गावांना पाणी पुरवठा करण्याच्या सूचना आ. रविंद्र पाटील यांनी उपस्थित अधिकार्यांना दिल्या.
जेएसडब्ल्यू कंपणीची जुनी पाईप लाईन दुरुस्त करुन पाणी पुरवठा सुरु करण्यात येईल, तर नविन पाईप लाईन लवकरच सुरु करण्यात येईल.
- बळवंत जोग,
महाव्यवस्थापक, जनसंर्पक जेएसडब्ल्यू कंपनी