पोलादपूर । नगरपंचायत पोलादपूर आणि पोलादपूर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापन व प्रशासनातील सामंजस्याअभावी स्थानकाच्या आवारात निर्माण झालेल्या सांडपाण्याचा प्रश्न सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धसास लावण्याचा निर्धार केला असून शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी या पार्श्वभूमीवर आजपासून स्थानक परिसरामध्ये स्वाक्षरी आंदोलन सुरू केले आहे.
पोलादपूर एस.टी.स्थानकातील स्वच्छतागृह आणि गटारांची लॉकडाऊन काळात प्रवासी व गाडया नसताना वेळीच देखभाल केली न गेल्याने आता महामंडळाची प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर बसस्थानकामध्ये मोठया प्रमाणात दूर्गंधीयुक्त सांडपाणी वाहू लागले असून प्रवासी व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत पोलादपूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी स्थानक प्रमुखांना निवेदन देऊन सांडपाणी दूर न झाल्यास लवकरच आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी मनसेचे वरिष्ठ सल्लागार योगेश सकपाळ, वसीम धामणकर, मनसेचे रायगड जिल्हाउपाध्यक्ष इरफान धामणकर, तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, शहर अध्यक्ष प्रवीण पांडे, शहर उपाध्यक्ष सुमित जिमन, आदेश गायकवाड व निखिल वनारसे, विघ्नेश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलादपूर एस.टी.बस स्थानकांतून बाहेर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर येणार्या सांडपाण्याबाबत यापूर्वी मनसेने बॅनरबाजी करून केलेले आंदोलन यशस्वी ठरल्यानंतर पुन्हा मनसेतर्फे स्वच्छ स्थानक स्वच्छ स्वच्छतागृहे हा प्रवाशांचा हक्क असल्याची जाणीव निर्माण करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेद्वारे अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पोलादपूर नगरपंचायत प्रशसनाने हा प्रश्न महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगून दूर्लक्ष केले आहे तर महामंडळाचे अधिकारी याबाबत मौन सोडत नसल्याने या आंदोलनाद्वारे प्रवासी जनतेचा स्वच्छ स्थानक स्वच्छ स्वच्छतागृह यासाठीचा हक्क अबाधित राहण्यासाठी पाठिंबा गोळा करण्यासाठी ही स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येऊन प्रवासी जनतेच्या पाठिंब्यासह मागणीचे पत्र पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासह सर्वसंबधित यंत्रणांना देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मनसे शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे आ. भरत गोगावले आणि राजिपच्या तत्कालीन अध्यक्षा अदिती तटकरे यांनी पोलादपूर एस.टी. स्थानकातील स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात पाठपुरावा केल्याची चर्चा मोठया प्रमाणात झाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होऊन राज्यात महाआघाडीसरकार स्थापन झाल्यानंतर विद्यमान पालकमंत्री अदिती तटकरे आणि आ. भरत गोगावले यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष दिले असते तर पोलादपूर एस.टी. स्थानकातील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला नसता असे मनसे अध्यक्ष दर्पण दरेकर यांचे म्हणणे आहे.