राज्यात आता तुरूंग पर्यटन ! गृहमंत्र्यांची माहिती

By Raigad Times    23-Jan-2021
Total Views |
yevada jail_1  
 
मुंबई । 'मला जेलमध्ये जायचे आहे'असे सांगणारा या जगात भेटणार नाही. जेल म्हणजे गुन्हेगारांना शिक्षेसाठी ठेवण्यात येणारे ठिकाण असे आपण मानतो. मात्र याच जेलमधून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपले स्वातंत्र्यसेनानी, महापुरुषांना इंग्रजांनी डांबून ठेवले होते. ही ठिकाणं सामान्यांना पाहता यावीत, यासाठी राज्य सरकार 'तुरूंग पर्यटन' नावाची संकल्पना राबवणार आहे.
 
याची सुरूवात 26 जानेवारी 2021 पासून होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुरूंग पर्यटन योजनेचे उद्घाटन करणार आहेत. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर जेलचा यात समावेश केला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत याची दिली.
 
राज्यात 60 तुरूंग आहे. जवळपास 24 हजार कैदी या तुरूंगात आहेत. 3 हजार कैदी तात्पुरत्या तुरूंगात आहेत. जेल पर्यटनाची सुरूवात आम्ही करत आहोत. त्याला विद्यार्थी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे यांचं उद्घाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष पुण्यात होणार्‍या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
 
महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबंडेकर यांच्यामध्ये जिथे पुणे करार झाला, ती जागा व्यवस्थित आहे. ज्या बराकीमध्ये महात्मा गांधींना ठेवले होतं, तोही व्यवस्थित आहे. मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांना ठेवण्यात आलेले सेल आहेत, ते विद्यार्थ्यांना, नागरिकांना बघता येणार आहे. त्यानिमित्ताने इतिहासाबद्दल संशोधन करणार्‍यांनाही याचा फायदा होईल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.