नुकसान भरपाईची मागणी
जेएनपीटी । न्हावा-शिवडी सागरी सेतू बाधित मच्छिमारबांधवांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी न्हावा, गव्हाण, घारापुरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांच्यावतीने 29 जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वपक्षीय संघर्ष समितीने हा निर्णय घेतला आहे.
एमएमआरडीएच्या कोपर येथील टाटा कंपनीच्या प्रोजेक्टवर शुक्रवार, दि. 29 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता धडक देण्यात येणार असून, कामबंद आंदोलन करण्याचा निर्धार गव्हाण भागातील सर्वपक्षीय संघर्ष समितीने एकमताने केला आहे. तशी माहिती व्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी दिली आहे. शनिवारी (9 जानेवारी) पनवेलमधील गव्हाण ग्रामपंचायतीच्या स्व.जनार्दन भगत सभागृहात झालेल्या सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी गव्हाणच्या सरपंच स्नेहलता भगत, घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, न्हावा ग्राम सुधार मंडळ अध्यक्ष आशिष पाटील, न्हावाचे माजी सरपंच हनुमान भोईर, गव्हाणचे माजी सरपंच वसंत म्हात्रे, चंद्रकांत भोईर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रदीप ठाकूर, न्हावाच्या उपसरपंच साधना तांडेल, गव्हाणचे उपसरपंच सचिन घरत, घारापुरीचे उपसरपंच सचिन म्हात्रे, न्हावाचे माजी उपसरपंच किसन पाटील, सागर ठाकूर, हरिश्चंद्र म्हात्रे, न्हावा शाखाप्रमुख हरेश्वर म्हात्रे, कोपर ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, माई भोईर, हेमंत ठाकूर, चंद्रकांत घरत, गौरव म्हात्रे, सी.एल. ठाकूर यांच्यासह न्हावा-शिवडी सेतू बाधित मच्छिमार, ग्रामस्थ उपस्थित होते.