सूर्यकांत म्हात्रे/चिरनेर । भातपिकानंतर रब्बी हंगामात शेतकर्यांना हात देणारी वालाची शेती बहरात आली आहे. यावर्षी पावसाच्या पाण्यात भातपिक हातचे गेले असले तरी वालाचे पीक शेतकर्यांना नक्कीच चांगले उत्पन्न देईल अशी बळीराजाला आशा निर्माण झाली आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर पंचक्रोशीत भातशेतीची कामे उरकल्यावर वाल पिकाची पेरणी केली जाते.शेतात नांगरून किंवा टोकन पद्धतीने वालाचे बीज पेरले जाते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या थंडीच्या मौसमात पडणार्या दवबिंदूंच्या शिंपणात वालाच्या पिकाला चांगलाच जोम येतो. यावर्षी चांगली थंडी सुरू झाल्याने वालाची शेती हिरवीगार झाली असून आता काही शेतात वालपिकावर फुलेही बहरली आहेत.
वाल पिकावर शेंगा लागल्यानंतर पंधरा वीस दिवसात त्या चांगल्या भरतात. त्या हिरव्या शेंगा बाजारात पन्नास ते साठ रुपये प्रतिकिलोने विकल्या जातात. अशी विक्री केल्यास शेतकर्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते.उरण तालुक्यात वालाची ‘पोपटी’ मोठ्या चवीने खाल्ली जाते. मडक्यात बिनपाण्याने शेंगा शिजवून केलेली पोपटी अत्यंत चविष्ट लागते. त्यामुळे अनेक खवय्ये वालाच्या हंगामात चिरनेर परिसरातील शेतांवर पोपटीसाठी आवर्जून हजेरी लावतात.
वालाची शेती बहरात आली असली तरी काही किड रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्याला नुकसान सोसावे लागते. त्यातच जंगली गुरांच्या झुंडी वालपिकात घुसल्या तर ती गुरे वाल पीक फस्त करतात. म्हणून अनेक शेतकरी वालपिकाचे रक्षण करण्यासाठी रात्री शेतावर वस्ती करीत आहेत.
वालपीक तयार झाल्यावर त्यापासून निघणारे वाल प्रतिकिलो दीडशे ते दोनशे रुपये किलोने विकले जातात. त्यामुळे शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळून त्यांच्या संसाराला हातभार लावला जातो. एकंदरीत यावर्षी वालपिक जोमात असल्याने बळीराजा सुखावला आहे.
---------------------------------------------------------------
आमच्या विभागात भात हे जरी मुख्य पीक असले तरी लहरी हवामान व मजुरीचे दर वाढल्याने भातशेती हा तोट्यातील व्यवसाय झाला आहे. मात्र वालाच्या पीकाची व्यवस्थित दक्षता घेतली तर वालपिकातून भातशेतीपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळते. त्यामुळे वालाची शेती नक्कीच फायद्यातील आहे.
- प्रफुल्ल खारपाटील, प्रगतशील शेतकरी, चिरनेर