अवकाळी पावसामुळे माणगांव तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान; शेतकरी हवालदिल

By Raigad Times    15-Dec-2020
Total Views |
avkali paus mangaon_1&nbs
                                                                                                                                                     
 बोरघर/माणगांव । अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात झालेल्या बदलामुळे माणगांव तालुक्यात सर्वत्र ढगाळ व आभ्राच्छादित अंधारमय वातावरण निर्माण होऊ गेली दोन दिवस रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात सर्वत्र संततधार अवकाळी पाऊस पडतो आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांच्या शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
या मध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांनी कापुन ठेवलेल्या भात पिकाच्या साठवण केलेल्या मळण्या, पेंढा, कडधान्ये उदाहरणार्थ मुग, वाल, मटकी, हरबरा, उडीद, पालेभाज्या, फळभाज्या, भाजीपाला, कलिंगड आणि बागायती शेती मधील आंबा, काजू, चिकू, फणस इत्यादी फळ पिकांचे त्याच बरोबर वीटभट्टी व्यावसायिक इत्यादिंचे या अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
 
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेल्या माणगांव तालुक्यातील शेतकर्‍यांची परवड अद्याप संपलेली नसताना सद्या माणगांव तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग पुन्हा एकदा धास्तावला आहे. कारण सद्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या सर्व प्रकारच्या पिकावर मोठे संकट येणार आहे. या भीतीने माणगांव तालुक्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
 
निसर्गचक्रात अचानक झालेल्या या अनपेक्षित बदलामुळे शेतकर्‍यांचा सर्व प्रकारच्या शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे आणि होणार आहे. त्याच बरोबर या खराब वातावरणामुळे मानवी आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होवू शकतो. या सर्व प्रकारच्या चिंतेमुळे माणगांव तालुक्यात शेतकरी हवालदिल झाला आहे.