जिल्हा परिषदेने कसली कंबर
17 ते 27 नोव्हेंबरदरम्यान विशेष अभियान
अलिबाग । जिल्ह्यात हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता यानुषंगाने जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत मिशन’च्या दुसर्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग 17 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता डॉ. दीप्ती पाटील यांनी दिली आहे. या अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्याची उपलब्धता करणे, सार्वजनिक शौचालय यांना वीज जोडणी देणे, सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात स्वच्छता करणे, कुटुंबस्तर शौचालय परिसरात स्वच्छता करणे व सुशोभीकरण, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरस्त शौचालयांची दुरुस्ती, वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व प्रोत्साहन अनुदान वाटप, वैयक्तिक शौचालय वापर दुरुस्ती परिसर स्वच्छता व सुशोभीकरण आदी बाबींना प्राधान्य देण्याचे आहे.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, स्थानिक पदाधिकार्यांच्या मदतीने गटविकास अधिकार्यांनी शौचालय वापराचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी संबंधितांना दिल्या आहेत.