जम्मू-काश्मीर । माजी मुख्यमंत्री व पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांना त्यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेले वक्तव्य, चांगलेच महागात पडत असल्याचं दिसत आहे. आज(सोमवार) त्यांच्या पक्षातील तीन नेत्यांनी मेहबुबा मुफ्तींवर नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
या अगोदर आज मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा रॅली काढली होती. एवढच नाहीतर पीडपी कार्यालवर देखील भाजपा कार्यकर्त्यांकडून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता. यामुळे तेथील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
टीएस बाजवा, वेद महाजन व हुसैन ए वफा या तीन नेत्यांनी पीडीपीला सोडचिठ्ठी दिली आहे. मेहबुबा मुफ्तींची कृती व विशेषकरून त्यांनी केलेली वक्तव्यं आमच्या देशभक्तीच्या भावनेला दुखावणारी व आम्हाला अस्वस्थ करणारी आहेत. असं या नेत्यांनी एका पत्राद्वारे सांगितलं आहे.
14 महिने स्थानबद्धतेत राहिल्यानंतर बाहेर पडलेल्या पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्या हातातील जम्मू-काश्मीरचा झेंडा दाखवत, ‘जोपर्यंत हा झेंडा परत येत नाही तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही असे म्हटले होते.